मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फोन केला. राजकीय आणि करोनाबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरेंना महत्त्वाची सूचनाही केली.
राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल आणि करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. मुंबई महानगरातील लोकसंख्या खूप आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. मात्र, आपण स्क्रिनिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवायला हवे. महाराष्ट्र सरकार सध्या चांगलं काम करत आहे, असे राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांना सांगितले.
दरम्यान, याआधी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. करोना लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत आहोत. राज्यात करोना कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करू, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या या संवादामुळे महाविकास आघाडीत काहीसं तणावाचं बनलेलं वातावरण निवळण्याची चिन्हं आहेत.