मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. आता गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन दिग्गजांची नावं समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची नावं चर्चेत आहेत. मात्र अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तर उत्पादन शुल्क खाते अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचं कळतं.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा आणि शरद पवारांचे खंदे समर्थक मुश्रीफ चर्चेत आले आहेत. कागलमधून ते सलग पाचवेळा निवडून आले आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सध्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे.