मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडीनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. गृहमंत्र्यांचा राजीनामा आधीच घेणं आवश्यक होतं. मात्र तस झालं नाही. खुद्द उच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. मुख्यमंत्री एवढे दिवसं गप्प का, राहिले असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.
दरम्यान सचिन वाझेंचे नाव आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटलं होतं की, वाझे काय लादेन नाही. मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक घटना घडल्या. अनेक आरोप झाले. तरी मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही. याला सर्वस्व सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार होते, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.