ठाणे – “मी आजही धडधाकट असून आजही पक्ष सांभाळण्यास सक्षम आहे. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला जनमानसात नेणार असल्याचे सांगत “ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ’ अशा शायराना अंदाजात वय झाल्याच्या टीकेला भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यासोबत आमदारांचा आकडा किती हे महत्वाचे नाही. 23 राज्यांचे पदाधिकारी आमच्यासोबत असून ते कार्यकारिणी बैठकीत होते. लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्ष राहिले पाहिजे. मात्र विरोधी पक्ष ठेवायचाच नाही असे भाजपाला वाटते. कोणाला अद्यापही फेरविचार करायचा असेल तर त्यांनी तो करावा, असा सल्लाही अजित पवार गटाला उद्देशून त्यांनी दिला.
पवार हे शनिवारी येवला येथील सभेसाठी नाशिकमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वयाबाबत टीका करणाऱ्या लोकांना ठणकावले. ते म्हणाले की, आजही माझी तब्येत सक्षम असून पक्ष पुढे चालविण्यासाठी जोमाने काम करत राहणार आहे. जोपर्यंत आपल्यावर प्रेम करणारी माणसे जवळपास आहेत, तोपर्यंत हा पक्ष पुढे नेण्यांसाठी काम करत राहणार आहे.
यावेळी, अजित पवारांच्या बंडानंतर पहिल्या सभेसाठी नाशिकच का निवडले याचेही कारण देताना ते म्हणाले, नाशिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की, इथे आमचे विचार पटणारे मतदार आहेत.”स्वातंत्र्यांनंतर कॉंग्रेसचे मोठे अधिवेशन येथे झाले. त्यामुळे नाशिकला मोठा इतिहास असल्याने दौऱ्याची सुरुवात येथून केली आहे. तसेच नाशिककडे येताना लोकांचे चेहरे पाहून माझा आत्मविश्वास वाढला. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी येवलामधून निवडणूक लढवावी असे सहकाऱ्यांनी सांगितले आणि भुजबळ यांनी येवल्यातून निवडणूक लढवली. त्यांनतर नाशिकमध्ये मोठे यश याआधी आम्हाला मिळाले.
सर्व बंडखोरांचा पराभव होणार
महाराष्ट्रमध्ये काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली, त्यात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. मला वैयक्तिक कुणावरही टीका करायची नाही. मात्र राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा पराभव होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांना दहा वर्ष मंत्रिपद दिले, लोकसभेत पराभव होऊनही पटेलांना राज्यसभेत पाठवले. अनेकदा लोक म्हणायचे सुप्रिया सुळेंवर तुम्ही अन्याय केला, सुप्रिया सुळे यांनी पक्षीय राजकारणात यावा, असा आग्रह कार्यकर्त्यानी केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी त्या निवडून आल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.