नवी दिल्ली – करोना प्रतिबंधासाठी लसीकरण केल्यानंतर प्रतिकूल घटनांची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे या करोना विरोधी लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान सतर्कता बाळगावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना केली आहे.
लसीकरणानंतरच्या या प्रतिकूल घटना गंभीर स्वरुपाच्या असल्याने प्रत्येक गटाच्या ठिकाणी किमान एक प्रतिकूल घटना व्यवस्थापन केंद्र असावे, अशी सूचना राज्य सरकारांना केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दैनंदिन वार्तालापादरम्यान सांगितले.
अनेक दशकांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमादरम्यानही मुले आणि गर्भवती महिलांमध्ये लसीकरणानंतर अशा प्रकारच्या प्रतिकूल घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या लसीकरणानंतरही अशा प्रकारच्या प्रतिकूल घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ज्या देशांमध्ये आता लसीकरण सुरू करण्यात आले आहे, त्या ब्रिटनसारख्या देशातही अशा विपरीत घटना पहिल्याच दिवशी घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा संभाव्य घटनांच्या व्यवस्थापनासाठीही राज्य सरकारांनी तयार रहावे, असे भूषण यांनी सांगितले.
अशा संभाव्य विपरीत परिणामांच्या व्यवस्थापनासाठीच्या सविस्तर सूचना राज्य सरकारांना पाठवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.