पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहे. त्याचा परिणाम इयत्ता पहिलीच्या प्रवेशावरही झाला असून, आता बालकाने वयाची सहा वर्षे पूर्ण केली असतील, तरच त्याला शाळेत प्रवेश मिळणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थाचे वय निश्चित केले आहे. देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्या प्रक्रियेपासून हा नियम लागू होत आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार तीन ते सहा वर्षे वयोगटाशी संबंधित प्री-स्कूलची तीन वर्षे आणि सहा ते आठ वर्षांपर्यंत वयोगटाशी संबंधित इयत्ता पहिली आणि दुसरीचे वर्षे समाविष्ट आहे. केंद्र शासनाचा हा नियम सर्व राज्यांच्या सर्व प्रकारच्या शाळांना बंधनकारक असेल.
सद्यस्थिती काय?
खासगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा भार पडायचा. अनेकांना बालपण अनुभवायला मिळत नव्हते. विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम व्हायचा.
एक देश, एक वयोमर्यादा, एक पात्रता
इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळी वयोमर्यादा आहे. काही राज्यांमध्ये पाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश दिला जातो. त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण व्हायची.
त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकर भरतीसाठी इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरतात. त्या मुलांना एक अटेंप्ट जास्त मिळायचा. त्यामुळे पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एकसारखी करावी अशी मागणी करण्यात आली होती.