नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील वैभव शिंदे या कृषी पदवीधराने भारतीय आंब्याला परदेशी निर्यातीसाठी मोठा वाव असल्याने दोन एकर जमिनीत नाविन्यपूर्ण 1500 केशर आंब्याची लागवड केली आहे. या कामात त्यांना आई लक्ष्मी शिंदे, वडील विठ्ठल शिंदे आणि पत्नी नम्रता शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे.
जमिनीची निवड :आंबा लागवडीसाठी मुरबाड जमिनीची निवड करून जमिनीमध्ये सर खोदले. चरामध्ये पालापाचोळा, शेणखत, गांडूळ खत टाकून जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ तयार केले.
हवामान : पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणात आंबा पीक चांगले उत्पादन देऊ शकते. आंब्यासाठी 10 ते 30 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. त्यामुळे जुन्नर परिसरात आंब्याची वाढ चांगली झाली आहे. केशर आंब्याला प्रत्येक वर्षी उत्पादन येत असल्याने स्थानिक व परदेशी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते.
लागवड पद्धत : आंबा लागवडीसाठी कोकण कृषी विद्यापीठातून वैभव शिंदे यांनी कलमे आणली. व लागवडीसाठी 125 फूट अंतरावर लागवड केली. त्यानंतर बांबूने आधार दिला. 2019 मध्ये दोन एकर जमिनीत एकूण 1500 केशर आंब्याची कलमांची लागवड केली आहे.
आंतरपीक : सुरुवातीच्या दोन वर्षे सोयाबीन, भुईमूग यांसारखे आंतरपिके घेतली त्यामुळे आर्थिक फायदा झाला.
आच्छादन : आंबा फळ उन्हाळ्यात येत असल्याने झाडाच्या खोडाजवळ वाळलेले गवत, गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, केळीचा पाला यांचा वापर करून आठ ते दहा सेंटिमीटर जाडीच्या थराचे आच्छादन केले, त्यामुळे त्यांची वाढ कमी झाली.
रोग व किड नियंत्रण : बागेमध्ये शेंडा आळी, पाने खाणारी अळी, खोड कीड व इतर किडीसाठी रासायनिक व सेंद्रिय कीटकनाशकांची तसेच बुरशी नियंत्रणासाठी बुरशीनाशक फवारणीचा वापर केला.
झाडांची वळण व छाटणी व्यवस्थापन
आंबा लागवड केल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा जमिनीपासून दोन फुटांवर कट केला. नवीन फुटव्यापैकी सशक्त तीन ते चार फुटवे ठेवले. ठेवलेल्या चार फुटव्यांची वाढ दीड ते दोन फुटांपर्यंत झाल्यावर त्याचा शेंडा कट केला. झाडाला छत्रीसारखा आकार दिला. आंबा तोडणी पूर्ण झाल्यानंतर लगेच छाटणी केली. त्या जागी कॉपर ऑक्सिक्लोराइड व क्लोरोपायरीफॉसचे पेस्टिंग केले. निरोगी फूट निघण्यासाठी ठिबकद्वारे योग्य प्रमाणात पाणी व नत्रयुक्त खते दिली.