पुणे – खडकवासला धरणसाखळीत संततधार कायम असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खडकवासला धरण सुमारे 92 टक्के भरले. त्यामुळे मंगळवारी सकाळी कालव्याद्वारे हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान, खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी सातच्या सुमारास धरणाचे दरवाजे उघडून 428 क्यूसेक, तर त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने रात्री अकरा वाजता 3,424 क्यूसेकने नदीमध्ये पाणी सोडण्यात आले.
यंदा पहिल्यांदाच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या खडकवासला – 1.81, पानशेत – 7.23, वरसगाव – 7.87 आणि टेमघर धरणात 1.68 टीएमसी पाणीसाठा आहे. यंदा पावसाच्या आगमनासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खडकवासला प्रकल्पातील धरणांत अत्यल्प पाणीसाठा होता. त्यामुळे पाऊस पडेल की नाही, धरणे भरतील का, अशी धाकधूक निर्माण झाली होती. धरणे तळाला गेल्यामुळे पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यात कपात करण्यात आली.
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली. खडकवासला धरणात 92 टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने मंगळवारी घेतला. सुरुवातीस कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला. खडकवासला धरणात मंगळवारी 5, पानशेत-28, वरसगाव-25 आणि टेमघरमध्ये 30 मिमी पावसाची नोंद झाली, असे प्रशासनाने सांगितले.
सावधानतेचा इशारा
खडकवासला धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने नदीपात्रात कोणीही उतरू नये. तसेच नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हटवण्यात यावीत, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.