मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर स्थानिक पातळीवरचे राजकारण देखील बदलत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून अजित पवार यांच्याबरोबर अदिती तटकरे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले महाडचे आमदार भरत गोगावले यांनी देखील आठवडाभरातच आपली वर्णी मंत्रिमंडळात लागणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मंत्रिपदावरून रायगडात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी रायगडला नवे पालकमंत्री मिळणार असल्याचे सांगत सस्पेंस वाढवला होता. तेव्हापासूनच भरत गोगावले यांनी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न सुरू केले होते. हे प्रयत्न मंत्रिमंडळ विस्तारात संपणार असल्याचे सर्वांनाच वाटत असतानाच अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेत या महानाट्यात प्रवेश केला आहे. हा प्रवेश शिंदे गटातील आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांना चिंतेत टाकणारा आहे. त्यावर भरत गोगावले यांनी आता एक ऐवजी अर्धीच भाकरी मिळणार” अशी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.
त्यातच आता अदिती तटकरे यांच्याकडेच पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच वर्तवले जात आहे. त्यामुळे भरत गोगावले मुंबईत ठाण मांडून आहेत. गोगावले यांचा रविवार सुरत येथे पूर्वनियोजित कार्यक्रम होता. पण त्याचवेळेला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांना अचानक मुंबईत बोलावण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर अन्य कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.