मुंबई – दोन दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर बसचा अपघात होऊन त्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाच्या येथे आज दुपारी 12 वाजता हा अपघात झाला आहे. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, भरधाव कंटनर हॉटेलमध्ये शिरल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर अनेक वाहने उभी होती. या कंटेनरची अनेक वाहनांनाही धडक बसल्याने या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.