लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उद्योजकाचे वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात अजिंक्य उत्तम कांबळे (वय. 34, रा. टिळेकरवाडी, ता. हवेली), ऋत्विक विजय दरेकर (रा. सहजपूर फाटा, ता. दौंड), प्रतिकेश उत्तम लोणकर (रा. सहजपूर) व समीर जावेद सैयद (रा. सहकारनगर, टिळेकरवाडी) या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी विशाल बापू खेडेकर (वय 34, रा. उरुळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
विशाल खेडेकर यांचे 23 डिसेंबर 2019 रोजी अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आले होते . याप्रकरणी अजिंक्य उत्तम कांबळे याला अटक करण्यात आली. उर्वरित तिघे जण अद्याप फरारी आहेत. या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींनी हा गुन्हा संघटितपणे केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
पुढील तपास हवेलीच्या उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, हवालदार एस डी कांबळे, सचिन पवार करीत आहेत.