पुरंदर तालुक्यात “तालेदार’ कुटुंबाची संख्या भरमसाठ : एकाच कुटुंबातील व्यक्तींना लाभ
सासवड – महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील पीक कर्जमाफीची दुसरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. जिल्हा बॅंकेच्या शाखेत महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या दाखल्यांचे वाटपही पार पडले. मात्र, पुरंदर तालुक्यातील पीक कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये राजकीय नेते, पुढारी,कार्यकर्ते, विविध संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या नावे खातेफोड झाल्यामुळे कर्जमाफीचा लाभ कुटुंबात झाला आहे.
एकत्र कुटुंब पद्धत पूर्वी अस्तित्वात असल्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतीक्षेत्राचे सातबाऱ्यावर फक्त कुटुंब प्रमुखाचेच नाव ठेवले जात होते. यामध्ये एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुम) अशा शीर्षकाखाली कुटुंब प्रमुखाचेच नावाने मोठ्या क्षेत्राचा सातबारा असत. कालांतराने विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेती क्षेत्राचे वाटप होऊन एका व्यक्तीच्या नावे असलेल्या क्षेत्राचे प्रमाण घटत गेले. सातबाऱ्यावरील खातेदार व वारसदार यांच्या नावांची संख्या देखील वाढत गेली. त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने सातबारा व 8 अ नोंदणी करण्याची पद्धत अस्तित्वात आली.
शासकीय लाभ आणि योजना मिळविण्यासाठी तसेच अन्य कारणांमुळे कुटुंबातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीच्या नावाची नोंदणी केली जात आहे. सातबारा व 8 “अ’मध्ये करण्यात आघाडी घेतली. त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वंतत्र खातेदार व कर्जदार झाली. परिणामी एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुले व सुना यांच्या नावे जिल्हा बॅंका, सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेता येणे शक्य झाले. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषदांमार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यात ही राजकीय मंडळीच आघाडीवर राहिली आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मात्र दुर्लक्षित राहिला आहे. तो कायमच शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहिला आहे. यापूर्वी केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी केलेल्या कर्जमाफीचा लाभ देखील अशाच संधीसाधू राजकीय पुढारी व शेतकरी अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या थकीत कर्जबाजारी पदाधिकाऱ्यांना याच लाभ झाला आहे. मात्र, पुरंदर तालुक्यातील नियमित कर्जफेड करणारा शेतकरी मात्र कायमच तोट्यात राहिला आहे.
सध्या पुरंदरमध्ये जिल्हा बॅंकेच्या 13 शाखा व त्याअंतर्गत 97 विकास सोसायटी आहेत. एकूण 23 हजार 704 शेतकरी सभासद आहेत. त्यातील 9 हजार 682 सभासदांना 72 कोटी 33 लाख 35 हजारांच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे. 13 हजार 329 सभासदांनी नियमित कर्जफेड केली आहे. कर्जमाफीमध्ये राजकीय नेते, पुढारी, पदाधिकारी, विविध संघटनांचे नेते यांचाच भरणा असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
धनाढ्यांच्या शिवारातच कर्जमाफीचे पिक तरारले
पुरंदर तालुक्यातील कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये 5 ते 10 टक्के शेतकरी हे राजकीय पदाधिकारी असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. बहुतांश कुटुंबात पती, पत्नी, मुलगा यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांप्रमाणे 6 लाखांची कर्जे माफ झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नियमित कर्ज फेडणारे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये माफ झाले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कर्जमाफीचा लाभ सधन कुटुंबात जादा झाल्याचे दिसून येत आहे. तसेच एकाच कुटुंबात दोन ते तीनजणांची खातेफोड झाल्यानंतर हे लाभार्थी कर्जमाफीचे मोठे लाभधारक ठरले आहेत.