पेकिंग – पं. नेहरू व चाऊ एन लाय यांच्या वाटाघाटी आशियाई राष्ट्रांत सहवास्तव्य आणि ऐकमेकांच्या कारभारांत हस्तक्षेप न करण्याच्या धोरणास पूरक ठरत आहेत असे कळते.
या वाटाघाटीचे फळ म्हणजे नेहरू-चाऊ पंचतत्त्वानुसार चीन व इंडोनेशिया यांच्या दरम्यान होऊ घातलेला पंचतत्त्व करार होय, असे सांगण्यात येते. आग्नेय आशियात शांतता प्रस्थापनेच्या मार्गात असणारे अडथळे दूर केले पाहिजे असे नेहरू व लाय या आशियाई बड्या नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते. शांतता प्रदेशाचा विस्तार करण्याची मनीषा लाय यांनी व्यक्त केली.
चीनखेरीज इतर राष्ट्रांत जे चिनी रहिवासी आहेत त्यांच्या संबंधी, त्या राष्ट्राशी चीनचे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आहेत त्यांच्याशी प्रथम वाटाघाटी करण्याचे चीनने मान्य केले असून सुरुवात म्हणून इंडोनेशियाशी लवकरच वाटाघाटी सुरू होतील.
पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेतील महत्त्वाचे संशोधन
पुणे – येथील राष्ट्रीय रसायन प्रयोग शाळेचे संचालक डॉ. जी. आय. फिंच यांनी स्थानिक वार्ताहरांना मुलाखत देऊन, प्रयोग शाळेत चाललेल्या कामकाजाची माहिती दिली व नंतर प्रयोग शाळेचे कामकाज कसे चालते ते समजावून सांगितले. शरीरात कृत्रिमरीत्या दिल्या जाणाऱ्या रक्ताऐवजी “प्लाझ्माचा पर्याय’ म्हणून उपयोगात आणता येईल असा “जिलेटिन’ हा द्रव पदार्थ हाडापासून उत्पादन करण्याची नवी क्रिया शोधून काढण्यात आली आहे.
हा शोध अत्यंत महत्त्वाचा असून लवकरच त्याचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन हाती घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर मोटारीचे टायर बनविण्यासाठी उपयुक्त अशी कार्बन ब्लॅक ही पावडर तयार करण्याचे प्रयोग सध्या चालू आहेत.
तेलशुद्ध करण्याच्या कारखान्यातून जो गाळ फेकून दिला जातो त्यापासून कार्बन ब्लॅक बनविण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी “रेडिओ-ऍक्टिव्ह ट्रेसर लॅबोरेटरी’चे कार्य कसे चालते याची पत्रकारांना सप्रयोग माहिती दिली.