हिमांशू
“कट्यार’ आठवते का? असं कुणी विचारलं तर माणसं संबंधिताला वेड्यात काढतील. लागी कलेजवा कट्यार, तेजोनिधी लोहगोल, घेई छंद मकरंद, सुरत पिया की, मुरलीधर श्याम, या भवनातील गीत पुराणे, दिन गेले भजनाविण सारे अशी एकाहून एक श्रेष्ठ नाट्यपदं केवळ “कट्यार’ या एका उच्चारामुळं कानाभोवती पिंगा घालू लागतील. सिद्धहस्त लेखक आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी 1967 मध्ये नाट्यरसिकांच्या पदरात टाकलेलं हे खणखणीत नाणं.
भार्गवराम आचरेकर, वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार, फय्याज यांच्यासारख्या कसलेल्या गायक-अभिनेत्यांच्या पहिल्या संचापासून राहुल देशपांडे, महेश काळे, सुबोध भावे यांच्या नव्या संचापर्यंत गेली 55 वर्षे “कट्यार’चं गारूड रसिकमनावर कायम आहे. ज्यांना या नाटकाची जादू माहीत नाही, ते 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे या संचातील चित्रपटाकडे बोट दाखवतील. ज्यांना दुर्दैवानं यापैकी कशाचीच माहिती नाही, त्यांना “बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील कट्यार आठवेल.
बुंदेलखंडावर आलेलं संकट टाळण्यासाठी बाजीराव मदतीला धावतात आणि लढाईत आपला प्राण वाचवणाऱ्या मस्तानीला कट्यार भेट देतात. त्यानंतर बुंदेलखंडच्या राजेसाहेबांनी पुण्याला पाठवलेल्या नजराण्यांसमवेत मस्तानीही येते आणि “क्षत्रिय मुलींचं लग्न कट्यारीशीही लावलं जातं,’ असं शनिवारवाड्यात बेधडक सांगते, असं चित्रण असलेला संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट “अनेकार्थानं’ गाजला होता.
याखेरीज प्रतापगडाच्या पायथ्याला झालेल्या भेटीत अफजलखानाने महाराजांवर वार करण्यासाठी कट्यारीचाच वापर केला होता, हे तर सर्वांनाच आठवत असेल. “कट्यार’ या शब्दाच्या आणि शस्त्राच्या, महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या इतिहासाचा हा झाला थोडासा अंश. आज या कट्यारीची आठवण होण्याचं कारण कट्यारीइतकंच खतरनाक आहे. आजच्या काळात हे हत्यार कुणी उपयोगात आणत असेल असं वाटलंही नव्हतं;
पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्यामुळं समोर आलेली माहिती भयानक आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई कार्यालयात हा अभियंता कार्यरत आहे. कंत्राटदार आपल्याला धमक्या देऊन, कट्यार दाखवून देयकांवर स्वाक्षऱ्या घेतात, अशी माहिती त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून, स्वसंरक्षणासाठी पिस्तूलचा परवाना मागितलाय. इंजिनिअर साहेबांची नियुक्ती गेल्याच महिन्यात अंबेजोगाईला झाली होती.
तिथला कारभार पाहून त्यांना धक्का बसला असावा, कारण तिथली एकंदरीतच कार्यसंस्कृती नाराज करणारी असल्याचं पत्र त्यांनी त्याच वेळी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. आता त्यांनी थेट पिस्तूलचा परवाना मागणारं पत्र लिहिल्यामुळं प्रशासनात खळबळ वगैरे उडाल्याचं बातमीत म्हटलंय. वस्तुतः इंजिनिअर साहेब म्हणतात त्याप्रमाणं कंत्राटदार बिलावर सह्या घेण्यासाठी कट्यार दाखवत असतील तर खळबळ त्याच वेळी उडणं अपेक्षित होतं. कदाचित पिस्तूलच्या परवान्याची मागणीच धक्कादायक असावी.
प्रशासनातल्या ज्यांना धक्का बसला त्यांना कट्यार ठाऊकच नव्हती असं गृहित धरूया. परंतु इंजिनिअर साहेबांनी पहिल्याच पत्रात आपल्या जिवाला धोका असल्याचा उल्लेख केला होता. वास्तविक कट्यार ही गौरवचिन्ह म्हणून देण्याची वस्तू असल्याचं आपली परंपरा सांगते. लग्न समारंभातही नवरदेवाच्या हातात कट्यार देण्याची प्रथा आहे. अशी ही कट्यार बदनाम झाली आणि टीकाटिप्पणीच्या कट्यारीला आयतीच धार मिळाली. स्वाक्षरी घेणाऱ्या अशा कट्यारी आणखी किती आणि कुठे-कुठे असतील?