आपल्यावर नाराज असलेला एखादा माणूस नाराजी व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे आला, तर आपण काय करतो? “या, बसा’ म्हणतो. चहा मागवतो, त्याची विचारपूस करतो, इकडच्या-तिकडच्या चार गोष्टी बोलतो आणि मग नाराजीचं मूळ कारण असलेल्या विषयाकडे वळतो… किंवा संबंधिताला तो विषय काढण्याची संधी देतो. मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होण्याआधीच जेव्हा मंत्रालयातल्या दालनांचं वाटप झालं, तेव्हा आम्हाला ही “डिप्लोमसी’ आठवली. मुळात मंत्रिपदच मिळालं नाही म्हणून तीन पक्षांमधले असंख्य आमदार नाराज. त्यातून मोठ्या मेहनतीनं, प्रदीर्घ चर्चेनंतर निवडलेल्या मंत्र्यांना पसंतीची खाती हवी असणार, हे उघड होतं. दीर्घकाळ रेंगाळलेला शपथविधी एकदाचा झाला; पण त्यानंतर लगेच इकडून, तिकडून नाराजीच्या बातम्या यायला लागल्या. ट्विटर हॅंडल सक्रिय होऊन नाराजी व्यक्त करू लागले.
आजवर विरोधकांना ऐकवलेली शेरोशायरी आप्तांना ऐकवण्याची वेळ काहीजणांवर आली. मंत्रिमंडळातून बाहेर राहिलेल्यांमध्ये एवढी नाराजी असताना आत घेतलेल्या मंडळींनी नाराजीचा सूर आळवू नये म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्याआधी मंत्रालयातलं दालन देण्यात आलं असावं… आधी “या, बसा’ म्हणावं, चहा पाजावा आणि नंतर विषय काढावा, या हेतूनं! “”मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला खरा; पण केबिन मात्र लगेच मिळालं हो! भेटीगाठीसाठी माणसं येऊ-जाऊ लागली,” असं नव्या मंत्र्यांनी एकदा उत्साहात सांगायला सुरुवात केली की खातेवाटप जाहीर करता येईल, असं प्लॅनिंग असावं.
पण मंत्रिमंडळात स्थान मिळणं- न मिळणं किंवा आवडतं खातं वाट्याला येणं- न येणं एवढीच नाराजीची कारणं नसतात, हे नंतर कळलं. आवडतं दालन न मिळणं किंवा नावडतं दालन मिळणं, यावरूनही मंडळी नाराज होऊ शकतात. उदाहरणार्थ, दालन क्रमांक 602. ती जागा कुणालाच नकोय. कारण ती शापित जागा आहे म्हणे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला हे दालन आलं आणि त्यांनी ताबडतोब ते नाकारलं अशी बातमी आली. पूर्वी उपमुख्यमंत्री असताना ते याच दालनात बसायचे. त्याच वेळी त्यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप झाले. पाठोपाठ सत्ताही गेली. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वाट्याला हे दालन आलं. आ
ज त्रिशंकू अवस्थेतली त्यांची धडपड सर्वजण पाहतायत. पांडुरंग फुंडकर, डॉ. अनिल बोंडे आदी मंत्र्यांनासुद्धा हे दालन “लाभलं नाही,’ अशी चर्चा आहे. थोडक्यात, हे दालन अपशकुनी आहे. सरकार शकून-अपशकून मानणाऱ्यांचं असो किंवा असले प्रकार मुळासकट नाकारणाऱ्यांचं असो, या दालनाबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. एखादी गोष्ट पटत असो वा नसो; पण उगाच रिस्क घेण्यात काय हशील? असाच पवित्रा या दालनाविषयी घेतला जातोय. इमारतीमधली एखादीच खोली अलगद काढून टाकण्याचं तंत्रज्ञान अद्याप उपलब्ध नाही, हेच दुर्दैव!
तसं पाहायला गेलं तर आपण सगळेच शापित आहोत. काही दिवसांपूर्वी सूर्यग्रहण झालं, तेव्हा केवळ भारतातच नव्हे तर आसपासच्या देशांमध्येही याचा अनुभव आला. अपंग व्यक्तीला ग्रहणकाळात गळ्यापर्यंत मातीत पुरून ठेवलं तर ती व्यक्ती धडधाकट होते, या समजुतीतून अनेकांनी तसा प्रयत्न करून पाहिल्याची बातमी आहे. अपंगत्व ठीक झालंच नाही; उलट मानसिक अपंगत्व चव्हाट्यावर आलं. आपले नेते आपल्यातूनच निवडून गेलेले. ते या मानसिकतेला अपवाद कसे असतील?
– हिमांशू