Abhishek Banerjee : तृणमूल काँग्रेस (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिले आहे. त्यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील कोणताही नेता त्याच्या डायमंड हार्बर मतदारसंघातून येऊन निवडणूक लढवू शकतो,तसेच “लोकशाही प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची परवानगी देते.” असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि भारतीय सेक्युलर फ्रंट (ISF) 2024 च्या संसदीय निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा जागेवरून उमेदवार उभे करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चांवर त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, “लोकशाही प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची मुभा देते. पण जो कोणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल त्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल.” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करताना बॅनर्जी यांनी, “2019 मध्ये पंतप्रधान डायमंड हार्बरवर आले आणि त्यांनी माझ्याविरोधात प्रचार केला आणि माझा पराभव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले होते कि अभिषेक बॅनर्जींच्या पायाखालची जमीन हादरेल, पण त्यावेळी मला जास्त मते मिळाली आहेत.
ते पुढे म्हणाले, “अनेकांनी डायमंड हार्बरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही चांगली गोष्ट आहे, ही लोकशाही आहे.” टीएमसी सरचिटणीसांनी इतर राज्यांतील नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास प्रोत्साहित केले आणि लोकांना तसे करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध लढा सुरू ठेवण्याची शपथ घेतली तसेच केंद्र सरकार “केंद्रीय एजन्सींचा गैरवापर”करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
दरम्यान, गुरुवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) समोर तिच्या हजेरीबद्दल बोलताना बॅनर्जी यांनी “मला त्याच दिवशी बोलावण्यात आले होते ज्या दिवशी मला एका कार्यक्रमात हजर राहायचे होते, परंतु मी त्यांच्या आदेशाचे पालन केले.” तसेच या प्रकरणासंदर्भात ईडीकडे 6,000 पानांचे दस्तऐवज सादर केले आहे आणि जेव्हाही त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा ते हजर होतील. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.