भारताची विरांगना राणी लक्ष्मीबाई म्हणजेच झाशीची राणी सर्वांना माहीत आहे. “मेरी झाशी नहीं दूँगी’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारी आणि घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन शत्रूंशी लढणारी ही विरांगना सर्वांना माहीत आहे. अशाच प्रकारचे शौर्य, धैर्य आणि निश्चय दाखविणारी दक्षिणेतील एक विरांगना, जिने झाशीच्या राणीच्या अगोदर 300 वर्षे आक्रमक पोर्तुगीज सैन्याला अक्षरशः पाणी पाजले. ती म्हणजे “राणी अबाक्का चौता महादेवी!’ कोण होती ही अबाक्का आणि कुठे? दुर्दैवाने तिची कहाणी जितक्या मोठ्या प्रमाणात सर्वांना माहिती हवी होती ती माहीत नाही. तिच्या पराक्रमाची कहाणी वाचली तर खरोखरीच ती विरांगना होती. तिने इ.स. 1555 मध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या पश्चिम किनाऱ्यावर ताबा मिळविणाऱ्या पोर्तुगीज सैन्याला धडा शिकविला. काय घडले? व कसे?
मसाल्यासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर इ.स. 1520 ते 1550 दरम्यान पोर्तुगीज सैन्य जहाजाद्वारे पश्चिम किनाऱ्यावर उतरवले. त्यावेळेस कालिकत बंदर व तो प्रांत झामोरीन राजाच्या ताब्यात होता. त्याचा पराभव करून पोर्तुगीज सैन्याने प्रथम कालिकत नंतर विजापूरचा सुलतान याच्या ताब्यातील प्रदेशावर कब्जा करीत, गुजरातच्या सुलतानाचे दमण बळकावले. महत्त्वाच्या मुंबई बंदराचा ताबा घेत गोवा घेऊन त्या ठिकाणी त्यांचे हेडक्वार्टर्स केले. पोर्तुगीजांच्या या आक्रमणाला हवा तेवढा विरोध झाला नाही. हा इतिहास आहे. मात्र प्रसिद्ध कपालेश्वर देऊळ पाडून त्या ठिकाणी चर्च उभारण्याच्या घटनेव्यतिरिक्त जास्त माहिती नाही. 1857 च्या ब्रिटिश विरुद्ध लढ्याची जितकी माहिती इतिहासात आहे तितकी याची माहिती नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळेच अबाक्काच्या पराक्रमाला नगण्य प्रसिद्धी किंवा इतिहासात नगण्य स्थान मिळाले. राणी अबाक्काने पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा घटनाक्रम याप्रमाणे –
इ.स. 1525 – मुंबई-गोवा यानंतर पोर्तुगीजांनी मंगलोर या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या बंदराकडे मोर्चा वळकवला. त्यावेळी मंगलोरपासून 14 किलोमीटर दक्षिणेकडे उल्लाल येथे अबाक्काचे राज्य होते. आता उल्लाल हा मंगलोरचाच भाग झाला आहे. पोर्तुगीजांना ही 30 वर्षांची बाई काय करू शकणार, असे वाटत होते. तिने शरणागती पत्करून दरवर्षी पोर्तुगीजांना खंडणी द्यावी म्हणून त्यांनी बोटी आणि सैनिक पाठविले. त्यापैकी कोणीच परत आले नाही.
इ.स. 1555 – चिडलेल्या पोर्तुगीज गव्हर्नरने बोटी व सैन्यांची संख्या वाढवून अनुभवी ऍडमिरल डॉम अलवरो सिल्वेरिया याच्या नेतृत्वाखाली पुन्हा उल्लालकडे कूच केली. यावेळेसही जखमी ऍडमिरल रिकाम्या हाताने परत आला. त्यानंतर मंगलोरवर कब्जा मिळवून पोर्तुगीजांनी आणखी सैन्य जनरल पेक्सोटो याच्या नेतृत्वाखाली उल्लाल ताब्यात घेण्यासाठी पाठविले.
इ.स. 1568 – यावेळी त्यांनी राणी अबाक्काला नामोहरम करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. त्यामध्ये हजाराच्या वर सैनिकांचा समावेश होता. त्यांच्याकडे आधुनिक हत्यारेही होती. पोर्तुगीज सैन्य उल्लाल येथे पोहोचले आणि काय आश्चर्य तेथे कोणीच नव्हते! ना अबाक्का ना सैन्य. पोर्तुगीज खूश झाले. त्यांनी जल्लोष करून आराम करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी राणी अबाक्का व तिच्या 200 सैनिकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. सर्वत्र गोंधळ माजला. जनरल पेक्सोटो मारला गेला आणि काही पोर्तुगीज सैनिक पकडले गेले. बाकीचे पळून गेले. ही मोहीम राणी अबाक्काने स्वतः राबविली होती. ही विरांगना केवळ विजय मिळवून थांबली नाही तर त्याच रात्री तिने आपल्या 200 शूर सैनिकांसह मंगलोरकडे कूच केली. मंगलोरचा किल्ला ताब्यात घेतला आणि पोर्तुगीजांना पळवून लावले. या लढाईत ऍडमिरल मस्कारेहमूस मारला गेला. राणी अबाक्का तेवढ्यावर थांबली नाही तर तेथून कुंडपूर-मंगलोरपासून 80 किलोमीटरपर्यंत सर्व प्रदेश परत मिळविला.
दुःखद शेवट – या विरांगनेचा शेवट मात्र आपल्याच देशद्रोहाच्या फसवणुकीमुळे झाला. अबाक्का तिच्या नवऱ्यापासून- बंगा लक्ष्मप्पा अरासापासून वेगळी झाली होती. त्याच नवऱ्याने तिचा बदला घेण्यासाठी पोर्तुगीजांना मदत केली. त्यामुळे तिला अटक करण्यात पोर्तुगीजांना यश आले व त्यांनी तिला तुरुंगात टाकले. तेथेही तिने बंड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तिला पोर्तुगीजांनी मारले. एका वीर राणीचा अंत झाला. लहानपणीच तिला तलवारीपासून सर्व हत्यारांचे प्रशिक्षण मिळाले होते.
कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या या विरांगनेनेच पोर्तुगीज हल्ल्याचे नियोजन आणि कारवाई केली. या शूरविरेला भारतीय इतिहासात जेवढे स्थान मिळावयास हवे होते तेवढे मात्र मिळाले नाही. तिची उपेक्षाच झाली, असे म्हणणे चुकीचे नाही. पूर्ण कर्नाटकातही ती सर्वांना माहीत नाही. उल्लाल येथे वीर राणी अबाक्का उत्सव दरवर्षी भरतो. 15 जानेवारी, 2003 मध्ये अबाक्काच्या नावे पोस्टाचे खास कव्हर काढण्यात आले. उल्लाल येथे तिचा एक ब्रॉंझ पुतळा आहे व बंगळुरू येथे एक आहे. या व्यतिरिक्त या राणीला पाठ्यपुस्तक वा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये योग्य स्थान मिळावयास हवे होते, ते मात्र मिळाले नाही.-(आधार – डॉ. कैलास मिश्रा)
कर्नल विनायक ताम्बेकर (निवृत्त)