स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. तुकोबांनीही तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं असं म्हटलं आहे. हे बऱ्याच अंशी खरं असलं तरी स्वभाव पूर्णपणे बदलल्याचा अनुभव आपल्याला कधी कधी येतो. निदान मला तरी आलाय. मला असं वाटतं की अगदी टोकाचा असा अनुभव आल्यानंतर किंवा संगती संगदोषणं या मार्गानंही स्वभावात बदल होत असावा. कधी तो तात्पुरता असतो पण कधी कायमचाही बदलतो. मी सुधारलेला आणि बिघडलेला बदल अनुभवला आहे.
मी ज्या कंपनीत संशोधनाचं काम करीत होतो तिथं एक तरुण, हुशार इंजिनियर काम करीत होता. त्याच्या परवानगीनं मी विकासाधीन मोटारगाडीचा एक भाग अभ्यासासाठी माझ्या प्रयोगशाळेत आणला. त्यानंही विनाअट तो भाग माझ्याकडे सुपूर्द केला. दोन दिवसांनी तो माझ्याकडे आला आणि मला रागारागानं म्हणाला, “तुम्ही जो भाग माझ्याकडून घेतला होता तो मला परत पाहिजे.’
मला तो रागावून का बोलतोय ते कळेना. मी शांतपणे म्हटलं, “तुम्ही तो दोन दिवसात परत करा असं म्हटलं नव्हतं. परंतु, मी तो परत देतो.’ तो भाग त्याला देऊ लागलो त्यासरशी तो म्हणाला, “मी तो नेणार नाही. तुम्ही तो जिथून नेलात तिथंच तो मला पाहिजे.’ मला त्याच्या या चमत्कारिक वागण्याचं आश्चर्य वाटलं कारण तो भाग अगदी छोटा आणि हलका होता. मात्र कुठलाही विरोध न करता निःसंकोचपणे जिथून तो भाग मी नेला होता तिथं नेऊन ठेवला. दिवसअखेर केव्हातरी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, “सर, मला क्षमा करा. मी तुमच्याशी असं वागायला नको होतं. माझा “इगो’ आड आला.’ मी म्हटलं, “अरे, त्यात काही विशेष नाही. मी जिथून नेला तिथं मीच नेऊन ठेवणं अपेक्षित होतं. फक्त तुला तो तातडीनं हवा होता हे मला माहीत नव्हतं.’ हा हुशार तरुण काहीसा अहंमन्य म्हणून प्रसिद्ध (!) होता पण या प्रसंगानंतर तो कमालीचा बदलला.
शाळेपासूनचा माझा मित्र कमालीचा श्रीमंत होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा प्रचंड गर्व होता. एकदा या गर्विष्ठ मित्रानं आम्हा मित्रांचा अपमान करून आम्हाला “चालते व्हा!’ असं म्हटलं. तेव्हापासून आम्ही त्याच्याशी संबंध तोडून टाकले. अनेक वर्षांनी तो त्याच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, “झालं गेलं विसरून जा. मी चुकीचं वागलो. आता आमचं ऐश्वर्य धुळीला मिळालंय आणि मला माझ्या उद्दाम वागण्याचा पश्चाताप होतोय. तेव्हा मला क्षमा करून तू पूर्वीसारखाच माझा दोस्त हो.’ नशिबाच्या फटक्यानं त्याला जमिनीवर आणलं होतं. श्रीमंती लयाला जाऊन या ऐषोआरामी मित्राला चक्क नोकरी करून उदरनिर्वाह करावा लागत होता.
एक अनुभव मात्र याउलट म्हणजे अस्वस्थ करणारा आहे. एक स्त्री व तिचा नवरा जो सराफी व्यवसायात होता, काहीही कारण नसताना मला व माझ्या कुटुंबाला पाण्यात पाहत. आमची अवहेलना करीत. मी नोकरीत असल्यानं “नोकरीत काही राम नसतो-नुसती दुसऱ्याची चाकरी. व्यवसायात कसा गडगंज पैसा आहे’, असे ते टोमणे मारत. कष्टानं आणि जिद्दीनं माझं घर उभं राहत असताना त्यांनी “हे कसलं छोटं घर? आमचा प्रचंड मोठा फ्लॅट तयार होतोय सहा महिन्यांत’ अशी वल्गना केली.
पस्तीस वर्षे लोटली “तो प्रचंड मोठा फ्लॅट’ आजतागायत त्यांना मिळालेला नाही. पोकळ वासा असलेला त्यांचा सराफी व्यवसाय आणि तो दिखाऊपणा, काही वर्षांतच सोन्याचा मुलामा झिजून आतील हिणकस धातू दिसू लागतो तसा नाहीसा झाला आणि ते कसाबसा संसाराचा गाडा रेटताहेत. खरं तर ती स्त्री आधी सुस्वभावी आणि मनमिळावू होती. त्यामुळे तिचं झोंबणारं बोलणं ऐकून मला सखेदाश्चर्य होत असे. पण नवऱ्याच्या उद्दाम आणि बढाईखोर संगतीमुळे तीही तशी बनली. तेव्हा स्वभावाला औषध आहे की नाही ते माहीत नाही पण तो बदलू मात्र शकतो.
श्रीनिवास शारंगपाणी