दिल्ली – आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची होळी तिहार तुरुंगातच साजरी होणार आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांची 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. सोमवारी सीबीआय कोठडी संपल्यानंतर सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना विपश्यना कक्षात पाठवले आहे. त्यांना गीता, डायरी आणि पेन ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे औषधे ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सिसोदियांना आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं जाणार आहे. खरं तर, 4 मार्च रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदियाच्या सीबीआय कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली होती. सीबीआयने मनीष सिसोदिया यांना आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला नोटीसही बजावली आहे. सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आता 10 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
आम आदमी पार्टीचे (आप) वरिष्ठ नेते दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटक झाल्यानंतर आठवडाभरापासून सीबीआयच्या ताब्यात आहेत. अटकेनंतर सिसोदिया यांना पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एम के नागपाल यांनी केंद्रीय एजन्सीला आणखी दोन दिवसांच्या कोठडीत पाठवल्यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
सिसोदियाच्या आणखी कोठडीची मागणी करताना सीबीआयच्या वकिलांनी सांगितले होते की, “ते चौकशीत अजूनही सह्योगाची भूमिका घेत नाहीएत आणि दोन व्यक्तीं समोर त्यांची चौकशी करण्यासाठी आम्हाला आणखी त्याच्या कोठडीची आवश्यकता आहे.” सीबीआयने न्यायालयाला सांगितले होते, “त्यांच्या मेडिकल चाचणीसाठी बराच वेळ लागला. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला पूर्ण दिवस लागला, ती फेटाळण्यात आली.”
Holi 2023 : “होळी व रंगोत्सव साजरा करताना….” होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा
दरम्यान, नव्या मद्य धोरणातील भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना शनिवारी दुपारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान सीबीआय मुख्यालय ते राऊस अॅव्हेन्यू कोर्टापर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून डीडीयू रस्ता दिवसभर बंद ठेवण्यात आला होता.