कोल्हापूर – युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिव सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते. शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी असून सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिलय.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प परिसर, करवीर तालुक्यातील आंबेवाडी , चिखली या गावातील पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांना शिवसेनेच्या वतीने अत्यावश्यक साहित्याचं वाटप देखील केलं. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य किट दिले खरे पण किटच्या माध्यमातून शिवसेनेने पोस्टरबाजीची संधी सुद्धा सोडली नाही.
दरम्यान यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पुरग्रस्तांच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास व्यक्त केला तर सरकारला शिवसेनेने 22 मुद्दे दिले असून त्याची सरकारने लवकरात लवकर अमंलबजावणी करण्याची गरज व्यक्त केलीय.
या महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे, त्यामुळे कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकार प्रयत्न करत आहे. देशातील अन्य भागात उद्धभवलेली परिस्थिती पाहता सरकारकडून राष्ट्रीय आपत्ती जाहीर होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.