नालंदा, (बिहार) – कावळा संदेश घेऊन आला आहे, बसण्यातून, घिरट्या घालण्यातून, पाहण्यातून आणि बोलण्यातून अनेक संकेत घेऊन आला आहे. कावळ्याकडून शुभ-अशुभ घटनांबरोबरच गावात पाहुण्यांच्या आगमनाची सूचना देण्याची परंपरा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरपूर गावात आजही सुरू आहे.
संध्याकाळ होताच चंडी तालुक्यातील हरपूर गावात कावळ्यांचे थवेच्या थवे येऊ लागतात. काव-काव ओरडणाऱ्या या कावळ्यांची गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर करडी नजर असते. त्यांचा पहारा इतका कडक असतो की, गावात शेवटची चोरीची घटना कधी घडली हे देखील गावकऱ्यांना आठवत नाही.
कुठलीही घटना घडण्याच्या आधी कलकलाट करून कावळे गावकऱ्यांना सावध करतात. याठिकाणी हजारोंच्या संख्येने कावळे आहेत. त्यांची गणती करण्यात आलेली नाही, पण गावकऱ्यांचा दावा आहे की, एक लाखांच्या आसपास कावळे असावेत. त्यामुळे हरपुरला कुणी कावळ्यांचे गाव म्हणतात तर कुणी कावळ्यांचे माहेरघर म्हणतात. कारण माहेरी जसे मुलीला सुख आणि आपुलकी मिळते तसेच सुख आणि आपुलकी कावळ्यांना या गावात मिळते. कुणीही त्यांना हाकलत नाही किंवा त्रास देत नाही.
कावळे पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील लोकही मुलांना घेऊन संध्याकाळच्या वेळी हरपुरला येतात. हरपुरच्या चारही बाजूंना दाट वृक्षराजी आहे. त्यावर या कावळ्यांची वस्ती असते. थंडी, उन, पावसाळा कुठल्याही ऋतूत हे कावळे इथून स्थलांतर करत नाहीत. दिवसा अन्नाच्या शोधात ते प्रामुख्याने उत्तरेकडील फतुहा किंवा जल्ला या 40-50 किलोमीटर अंतरावरील गावांपर्यंत जातात.
संध्याकाळी अंधार पडण्याच्या आधी हरपुरला परत येतात. सकाळी जाणारे कावळ्यांचे थवेच्या थवे आणि संध्याकाळी परतणारे थवे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. या कावळ्यांमुळे येथील पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे.
हरपूर गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव चिरैया नदीच्या काठावर वसले आहे. त्याखेरीज गावाच्या आसपास दोन डझन छोटे-मोठे तलाव आहेत. त्यामुळे सगळीकडे हिरवीगार वृक्षराजी असल्याने कावळ्यांच्या वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण आहे. नदी आणि तलावांमुळे वर्षभर परिसरातील तापमान तुलनेने कमी असते.
हे गाव चिरैया नदीच्या उत्तरेकडील काठावर वसले आहे. दक्षिणेकडील किनाऱ्यावर मकुंदन बिगहा आणि ओली बिगहा ही गावे आहेत. जेव्हा रोज सकाळी हरपुरमध्ये सगळे कावळे एकाचवेळी काव-काव सुरू करतात त्यामुळे तीनही गावात लोकांना जाग येते आणि दिवसाची सुरवात होते.
लग्न समारंभ किंवा दिवाळीत या गावात फटाके वाजवले जात नाहीत. गावातील 62 वर्षांचे शेतकरी महेंद्रप्रसाद म्हणतात की, शंभर वर्षांपासून या गावात कावळे राहात असल्याचे सांगितले जाते. जवळच्या रूखाई गावातही 55 पेक्षा जास्त तलाव आहेत. त्यामुळेच हुशार कावळ्यांनी हा परिसर वस्तीसाठी निवडलेला आहे.