अमरावती : महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात व त्यांच्यात उद्योजकतेचा विकास व्हावा, यासाठी महाविकास आघाडी शासनाने विविध योजना व उपक्रम अंमलात आणल्या आहेत. ‘माविम’ व इतर उपक्रमांच्या माध्यमातून त्यामुळे येत्या काळात राज्यातील सुमारे दोन कोटी महिलाभगिनींचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी वलगाव येथे व्यक्त केला.
उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान व स्वशक्ती महिला प्रभाग संघातर्फे महिला मेळावा वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, सक्षम महिला कुटुंबाला व समाजालाही प्रगतीकडे नेते. जग बदलण्याची ताकद महिलांमध्ये आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यासाठी महिलाभगिनींनी समकालीन घडामोडींबद्दल जागृत असले पाहिजे. आपल्या हक्कांप्रती जागरूकता व भान जागवणेही आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडी शासनातर्फे 2 कोटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना व उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, बचत गटामधील महिलांमध्ये उद्योजकतेचा विकास व्हावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अनेक योजना राबवित आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा बँकेतर्फेही जिल्ह्यात सुमारे 100 कोटी रूपये निधीतून बचत गटांना पतपुरवठ्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.