मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांसंबंधी तसेच त्यावरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांनी जो दावा केला होता त्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमुर्ती चांदीवाल आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात अनिल देशमुख यांच्यावरील परमवीरसिंह आणि सचिन वाझे यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे नमूद करण्यात आले आहे असे सांगण्यात येत आहे.
हा अहवाल अधिकृतपणे जाहीर झालेला नसला तरी त्यातील तपशील काही प्रमाणात बाहेर आला आहे, त्यात अनिल देशमुख यांना आयोगाने पुर्णपणे क्लीन चीट दिली आहे असे सांगण्यात येते. मुंबईत असलेल्या 1750 बार आणि रेस्टॉरंट्स मधून दरमहा शंभर कोटी रूपये वसुल करण्याचा आदेश अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस दलातील तत्कालिन सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना दिला होता अशी माहिती पोलिस आयुक्त परमीवरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे दिली होंती.
त्यामुळे राज्यात मोठीच खळबळ माजली होती. या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. चांदीवाल यांचा एक सदस्य चौकशी आयोग नेमला होता. या आयोगाने सर्वांची कसून चौकशी करीत आणि समोर आलेल्या कागदपत्रांची छाननी करीत आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात म्हणजे येत्या जुलै महिन्यात हा अहवाल विधीमंडळात सादर केला जाणार आहे. अनिल देशमुखांवर करण्यात आलेले सर्व आरोप निखालस खोटे आहेत असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.