नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज पहिल्यांदाच संसदेत अभिभाषण केले. यावेळी राष्ट्रपतींनी “जो भारत पूर्वी स्वतःच्या समस्यांसाठी इतर देशांवर अवलंबून होता, तोच भारत आता जगभरातील दुसऱ्या देशांच्या समस्या सोडवू लागला आहे. आत्मनिर्भरतेमुळे भारत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाचं सरकार भारताला भ्रष्टाचारमुक्त बनवू पाहात आहे, भारताला त्याचबरोबर एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनवणे हे आपले ध्येय आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले.
आज त्यांच्या संसदेतील अभिभाषणात त्यांनी,’केंद्रातल्या विद्यमान मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच आपला देश बदलत असल्याचे त्या म्हणाल्या. मुर्मू म्हणा्या की, “वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत आता घडू लागला आहे. देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनू लागलं आहे.”
राष्ट्रपती मुर्मू म्हणा्या की,“भारतात मोठं डिजीटल नेटवर्क तयार झालं आहे. त्याचबरोबर देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळत आहे. भारत हा देश मोठी अर्थ्यव्यवस्था म्हणून पुढे आहे. या सरकारने विकासाचा पाया घातला आहे.” केंद्रातल्या मोदी सरकारचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, “भारतात एक स्थिर, निडर आणि निर्णायक सरकार कार्यरत आहे. हे सरकार इमानदार लोकांचा सन्मान करणारं आहे. त्याचबरोबर आधुनिकतेला चालना देणारं सरकार आहे.”
“आयुष्मान भारत योजनेने देशातील कोट्यवधी गरीबांचं कल्याण केलं आहे. आगामी काळात एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनणं हेच आपलं ध्येय असेल. भारत वैश्विक स्तरावर एक बलवान राष्ट्र बनू लागला आहे. आपल्या जागतिक भूमिका आत्मविश्वासाने पुढे नेणारं सरकार देशाला लाभलं आहे. त्याचबरोबर देशात आपली भ्रष्टाचारासोबत निरंतर लढाई सुरू आहे, देशात भ्रष्टाचाराचं उच्चाटन सुरू आहे. जगाला हेवा वाटेल अशी वाटचाल देश करत आहे.” असे देखील राष्ट्रपती म्हणाल्या.