चेंबर झाकण्याचा कुटुंबाचा सजगपणा वाचवतोय अनेकांचे प्राण
पुणे – यंदा पावसाळ्यात चेंबर खचण्याचे सर्वाधिक प्रकार घडले आहेत. हे चेंबर न दिसल्याने अनेकदा वाहनांचा अपघात होत आहे. यात प्राणांतिक, तर कधी आयुष्यभरासाठी जायबंदी व्हावे लागत आहे. मात्र, कोथरूड येथील अजय आडकर आणि त्यांच्या कुटूंबाच्या एका छोट्या कृतीमुळे शहरातील अनेकांचे प्राण वाचले असून अपघातांपासूनही ते बचावले आहेत.
शहरात कोठेही खचलेले चेंबर दिसल्यास आडकर या चेंबरसमोर सुरक्षेसाठी बॅरिकेड अथवा धोका दर्शविण्यासाठी त्यांच्याकडे असलेली वस्तू या चेंबरपुढे लावतात. त्यामुळे खचलेल्या चेंबरचा वाहनचालकांना अंदाज येतो आहे. गेल्या काही महिन्यांत आडकर कुटुंबीयांनी अशा प्रकारे 80 ते 90 चेंबरच्या ठिकाणी ही उपाययोजना केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावरही कौतूक होत आहे.
अशी सूचली कल्पना खचलेल्या चेंबरची तक्रार आल्याशिवाय अथवा, एखादा अपघात होऊन पोलिसांनी तक्रार केल्याशिवाय महापालिका ती दुरूस्त करत नाही.
काही महिन्यांपूर्वी आडकर हे पत्नी तसेच मुलासह कर्वे रस्त्याने जात होते. त्यावेळी एका खचलेल्या चेंबरमध्ये त्यांची चारचाकी आदळली. त्यांचा ताबा सुटून गाडीचा अपघात होता होता वाचला. दुचाकीवर असतो, तर कुटुंबातील एकाचा तरी जीव गेला असता, याची जाणीव झालेल्या आडकर यांनी सजगता दाखवत त्यानंतर प्रत्येक खचलेल्या चेंबरच्या ठिकाणी आसपास रस्त्यावर जे साहित्य सापडेल ते वापरून खचलेले चेंबर वाहनचालकांच्या दिसेल, अशा पद्धतीने साहित्य चेंबरसमोर लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
खचलेले चेंबर रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. त्यात छोटी चारचाकी अथवा दुचाकी आदळून अपघात होतात. यातून कोणाचा जीवही जाऊ शकतो. अशा प्रकारच्या घटनेचा अनुभव आम्हाला स्वत: आला. त्यामुळे आमच्या कुटूंबातील कोणीही घराबाहेर पडलो तरी आम्ही सोबत पिशव्या तसेच चेंबरच्या पुढे लावण्यासाठी कापड अथवा इतर साहित्य सोबत ठेवतो. लगेच त्या ठिकाणी लावतो. यातून एखाद्याचा जीव वाचेल ही भावना आहे.
– अजय आडकर, सजग नागरिक