गाडी घरी असतानाही “फास्टॅग’चे पैसे गेल्याच्या तक्रारी
पुणे : गाड्या दारात उभ्या असतानाही, गाड्यांवर लावलेल्या “फास्टॅग’मधून पैसे कट होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या तक्रारी देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 1033 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, या क्रमांकावरही केवळ “टोलवा-टोलवी’च सुरू असल्याचे समोर आले आहे.
एखाद्या वाहन चालकाच्या खात्यातून टोल नाक्यावर न जाताही पैसे गेले असतील तर तक्रार देण्यासाठी वाहनधारकास अनेक किचकट कागदपत्रे तसेच माहिती मागितली जाते. तर एवढे करूनही केवळ तक्रार घेतली जाते. मात्र, त्याचा कोणताही मेसेज अथवा तक्रार क्रमांकही तक्रारदाराला दिला जात नाही. त्यामुळे “फास्टॅग’च्या नावाखाली असे “कट’ झालेले पैसे नेमके कोणाच्या खिशात जातात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले सुरेश परदेशी यांची गाडी घरीच असताना त्यांनी गाडीसाठी घेतलेल्या “फास्टॅग’च्या खात्यातून सोलापूर रस्त्यावर तीन ठिकाणी टोलची रक्कम वसूल झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर अनेक वाचकांनी “प्रभात’शी संपर्क साधून असे प्रकार आमच्या सोबतही वारंवार घडत असल्याचे कळविले. त्यानंतर अनेकांनी महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या 1033 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, ही यंत्रणाही किचकट असून मनस्ताप सहन करावा लागल्याने या हेल्पलाइन क्रमांकावरही मदत मिळत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
हेल्पलाइनची प्रक्रियाही किचकट….
हेल्पलाइनवर तक्रार करण्यासाठी नंबर डाइल केल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या गाडीचा क्रमांक घेऊन त्यानुसार पुढील प्रक्रीया करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात वाहनधारकांना पैसे गेल्याचा व्यवहार क्रमांक, बॅंकेतील ग्राहक ओळख क्रमांक मागितला जातो. अनेक जण फास्टॅग ऑनलाइन अथवा टोल नाक्याच्या आधी बॅंकांकडून नेमलेल्या प्रतिनिधींकडून घेतात, तर अनेक जण ऑनलाइन ऍप वरून फास्टॅग रिचार्ज करतात, अशा वेळी अनेकांकडे बॅंकेतील ग्राहक ओळख क्रमांक नसतो. तसेच, तक्रार केल्यानंतर ती नोंदवून घेण्याऐवजी वाहनचालकांना बॅंकेशी संपर्क करण्यास सांगण्यात येते. मात्र, आम्ही केवळ पैसे देतो, ते कसे गेले आमचा त्याच्याशी संबध नाही, असे सांगत वाहन चालकांना टोलवित आहेत. त्यामुळे, कोणताही दोष नसताना पैसे तर जात आहेतच शिवाय, या टोल फ्री क्रमांकावरही वाहनधारकांना टोलवा टोलवीची सामना करावा लागत आहे.
खात्यातून तीन वेळा पैसे गेल्यानंतर मी बॅंकेत आणि टोल फ्री क्रमांकावर फोन केला. प्रत्यक्षात फास्टॅग देताना वाहन क्रमांक, बॅंक खाते, तसेच इतर आवश्यक माहिती आमच्याकडे घेतली जाते. त्यामुळे केवळ वाहन क्रमांकानुसार, तक्रार घेणे अपेक्षित असताना, बॅंकेतील ग्राहक क्रमांक, व्यवहाराचा क्रमांक अशा अनेक स्वरूपाची माहिती मागतात. त्यानंतर तक्रार क्रमांक अथवा त्याचे स्टेटस काय आहे, हे कळविले जात नाही. मी दोन वेळा तक्रार केली आहे.
– सुरेश परदेशी, तक्रारदार