पुणे – पावसाळ्यात शहरी भागात पूरस्थिती उद्भवणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षीच महापालिकेची डोकेदुखी ठरू लागलेल्या पावसाळी पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेकडून स्वतंत्र स्ट्रॉम वॉटर विभाग तयार करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे.
पावसाळी जलवाहिन्यांचे काम आधी पथ विभागाकडून केले जात होते. त्यानंतर आता ते ड्रेनेज विभागाकडे देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील दरवर्षी पाणी साचण्याची ठिकाणे वाढतच असल्याने महापालिकेने या कामासाठी स्वतंत्र विभाग अथवा कक्ष सुरू करण्याची तयारी केली आहे. शहरात सुमारे 1,400 किलोमीटरचे रस्ते असले, तरी पावसाळी वाहिन्या केवळ 450 किलोमीटरच आहेत. तर अनेक भागांत त्या विकासकामात बुजविण्यात आल्या आहेत.
शहरात गेल्या पाच ते सहा वर्षांत स्मार्ट सिटी अंतर्गत नवे पदपथ, अनेक उड्डाणपूल, मेट्रो, तसेच समान पाणी योजनेसह इतर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खोदाई झालेली आहे. शिवाय मोबाइल कंपन्या, महावितरण तसेच “एनएनजीएल’कडूनही खोदई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी सखल भाग तयार झाले आहेत.
परिणामी, पाणी साचणाऱ्या भागांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी अशी सुमारे 325 ठिकाणे होती. महापालिकेने त्यातील जवळपास 280 ठिकाणी काम करून उपाय योजना केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात यंदाच्या वर्षी हा आकडा आणखी वाढला आहे.
स्वतंत्र विभागाची गरज का?
पावसाळी वाहिन्या टाकणे, त्याची स्वच्छता याची जबाबदारी महापालिकेने आधी पथ विभागाकडे दिली होती. शहरात नवीन रस्ते विकसित केले जात असताना त्या कामांसोबतच पावसाळी वाहिन्या टाकल्यास अडचण येणार नाही, असा यामागे उद्देश होता. मात्र, सफाईचे काम पथ विभाग करणार नसल्याने ही जबाबदारी आरोग्य विभागाकडे देण्यात आली. मात्र, त्यांनीही हात झटकल्याने आता हे काम ड्रेनेज विभागाकडे देण्यात आली आहे.
मात्र, या विभागाकडून केवळ स्वच्छता केली जाते. पाण्याचा निचरा तसेच इतर नियोजनाचे काम व्यवस्थित केले जात नसल्याने स्वतंत्र विभाग नेमल्यास हा विभाग पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता, गरज असलेल्या ठिकाणी नव्या वाहिन्या टाकणे, पावसाचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन नवीन नियोजन करणे अशी कामे सोपी होतील. तसेच या कामासाठी स्वतंत्र निधीही मिळेल.