वाठार स्टेशन – हिवरे, ता. कोरेगाव येथील इयत्ता 6 वीत शिकणार्या विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (वय 12) याचा वडिलांनीच गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. घटना घडल्यापासून दोन दिवसांत पोलिसांनी वेगाने तपास केला. अखेर, आपणच हा खून केल्याची कबुली विजय खताळ याने काल (दि. 25) रात्री दिल्यानंतर, वाठार पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम खताळ याचा शनिवारी (दि. 23) गळा आवळून खून झाल्याची फिर्याद त्याचे वडील विजय खताळ याने वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दिली. गुन्ह्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने खोटी फिर्याद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 15 दिवसांपूर्वी विजयने स्वतःचे वजन केले असता, ते 20 किलोने कमी झाले होते. त्यामुळे आपल्याला कॅन्सरसारखा भयंकर आजार झाल्याचा समज त्याने करून घेतला. आपण लवकर मरणार आहोत आणि आपल्या पश्चात मुलाचे जगणे कठीण होईल. त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, या समजातून मुलाला संपवण्याचा विकृत विचार त्याच्या मनात भिनला. त्याने शनिवारी (दि. 23) घरापासून काही अंतरावरील जनावरांच्या गोठ्यातून गायीच्या एका बाजूला बांधलेली दोरी सोडून खिशात घातली आणि गाय साडीच्या धडप्याने बांधली.
त्यानंतर त्याने शेतात जनावरांसाठी चारा काढण्याच्या बहाण्याने बायको आणि मुलाला घरातून कुंभारकी नावाच्या शिवारातील शेतात नेले. शेतापासून काही अंतरावर विजयची पत्नी जळण काढण्यासाठी गेली. विजय व विक्रम हे जनावरांसाठी वाढ्याचे कोंब काढण्यासाठी, तोडणीस आलेल्या उसाच्या शेतात गेले.
त0यावेळी विजयने मुलाला सांगितले की, आपण गरीब असल्याने, लोक आपल्याला भरपूर त्रास देणार. तुला कोण काही बोलल्यास त्यांना घाबरू नकोस. हे संभाषण सुरू असताना विजयने खिशातून दोरी काढत विक्रमच्या गळ्यात टाकली आणि अशी दोरी टाकून ओढायची, असे म्हणत विक्रामचा गळा आवळला. विक्रम हा दहा मिनिटांनी निपचित पडल्यानंतर, त्याचा मृतदेह उसाच्या सरीत ठेवून, तो पाचटीने झाकला. त्यानंतर उसाचे कोंब काढून शेजारच्या शेतात टाकले. त्यानंतर विजय हा दुपारी 4 वाजता गावाच्या दिशेने जात असताना, विक्रम अजून घरी का आला नाही, हे विचारण्यासाठी पत्नीचा फोन आला.
त्यावर, विक्रमची चप्पल रानात विसरली आहे. ती आणायला तो पुन्हा शेतात गेला आहे, असे सांगून विजय पुन्हा शेतात गेला. तेथे असलेली विक्रमची चप्पल शेताच्या बांधावर टाकली. त्यानंतर गावाजवळच्या गोठ्यात जाऊन, गुन्ह्यात वापरलेली दोरी गायीला पुन्हा बांधून ठेवली. खुनाचे स्वरूप पाहून आणि दोन दिवसांच्या तपासातून पोलिसांचा विजयवरील संशय बळावला. बापाने विकृतीतून आपल्या एकुलत्या एक निष्पाप मुलाचा खून केल्याचा पर्दाफाश अखेर स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलिसांनी केला. विजय खताळ याला पोलिसांनी कोरेगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला शुक्रवार, दि. 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सुधीर पाटील, रवींद्र मोरे, वाठार स्टेशनचे सपोनि शिवाजी भोसले, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, संदीप बनकर, हवालदार तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, शरद बेबले, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने प्रवीण फडतरे, राकेश खंडके, अमोल माने, अजित कर्णे, सनी आवटे, शिवाजी भिसे, स्वप्निल कुंभार, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ओमकार यादव, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, अमृत कर्पे, विजय निकम, संभाजी साळुंखे, अमित झेंडे, अजय जाधव, नितीन भोसले, उदय जाधव, प्रशांत गोरे, प्रतीक देशमुख यांनी ही कारवाई केली.
मुलाची आई आणि ग्रामस्थ सुन्न
विक्रम हा बापाच्या मानसिक विकृतीचा बळी ठरल्याचे स्पष्ट झाल्याने, खताळ कुटुंबीय, विक्रमची आई आणि हिवरे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. या खुनाबाबत गेल्या दोन दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. यामध्ये निष्पाप प्रणवचा काय दोष होता, या भावनेने नातेवाइक आणि ग्रामस्थ गहिवरून गेले होते.