मुंबई : राज्यात कोरोनाच्या लाटेने दुसऱ्या थैमान घातले होते. या लाटेला थोपवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लावल्याचा थोडा चांगला परिणाम आता समोर आला आहे. राज्यात नवीन कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 60 हजारांच्या खाली आला आहे. आज राज्यात 51 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16% एवढे झाले आहे.
राज्यात आज 891 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
टेस्टिंगमध्ये कुठेही घट न होता. कोरोनाची रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डिस्चार्स झालेल्या रुग्णांची कमी होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.7 टक्के आहे तर देशाचा रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षा जास्त आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.