संगमनेर – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करून खुर्चीसाठी मुलासह महाविकास आघाडीत मंत्रीपद घेऊन संधी साधली त्याचे काय? असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. मी म्हणजे शिवसेना हा शिमगा आता तरी बंद करा, असा सल्ला त्यांनी दिला.
रत्नागिरी येथील सभेत केलेल्या वक्तव्यांबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे योगदान देश कधीच विसरणार नाही. मात्र, सत्तेसाठी हे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीला नेवून बांधले. तेच आज भाजपमधील नेत्यांना संधीसाधू म्हणत आहेत. याचे आश्चर्य वाटते. भाजपाने कधीही स्व. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. मात्र, तुम्ही त्यांच्या विचारांचे आदर्शच खुर्चीसाठी बदलून टाकल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
राज्यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. जे जनतेच्या मनात होते तेच घडले असे स्पष्ट करून विखे पाटील म्हणाले की, कोणताही निकाल त्यांच्या बाजूने आला की, संस्था चांगली आणि विरोधात गेला की शिमगा करायचा अशी पद्धत सध्या ठाकरे गटाने सुरू केली आहे. मात्र, कशीतरी सत्याचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा. राज्यातील जनता सूज्ञ असल्याने येणाऱ्या निवडणुकीत सेना-भाजप सर्वत्र सत्तेवर दिसेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.