सातारा (प्रतिनिधी) – खटाव व खंडाळा तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने बनावट खाते काढून ग्रामपंचायतीच्या 45 लाख 17 हजार 814 रुपयांच्या अग्रिम रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरुन तिघांवर वडूज पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांनी दिली आहे. खटाव तालुका संगणक परिचालक जलाउद्दीन पटेल रा. मुसांडवाडी (ता. खटाव), तालुका व्यवस्थापक विशाल उत्तम सुर्यवंशी रा. म्हासुर्णे (ता. खटाव), विनोद भानुदास साळुंखे रा. भादे (ता. खंडाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाल्याने आता या गुन्ह्यात कोणाकोणाचा सहभाग आहे हे निष्पन्न होणार आहे.
ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून 2016 -17 ते 2021 -22 या कालावधीत अग्रीम रक्कमा जमा होणार्या जिल्हास्तरावरील प्रतापगंज पेठेतील आयडीबीआय बँकेतील खात्यात तफावत आढळून आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ही बाब गांभिर्याने घेत तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व जिल्हा स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठित केल्या होत्या. माण व खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अग्रिम रकमा शासकीय खात्याव्यतिरिक्त अनाधिकृत खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले होते. जिल्हास्तरीय समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत चोवीस तासात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश गौडा यांनी खटावचे गटविकास अधिकारी साळुंखे यांना दिले होते.
याबाबत साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खटाव येथील आपले सरकार सेवा केद्रातील संगणक परिचालक रियाज पटेल, व्यवस्थापक विशाल सुर्यवंशी व विनोद साळुंखे यांनी आपापसात संगनमत करुन आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नवाने जिल्हास्तरावर आयडीबीआय बँक प्रतापगंज पेठ शाखेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या संयुक्त स्वाक्षरीने उघडण्यात आलेल्या संबंधित खात्यांमध्ये ग्रामपंचायतींनी निर्धारित केलेली रक्कम जमा केली नाही. बनावट चलन तयार करुन आपले सरकार सेवा केंद्र नावाने रियाज पटेल याने स्वत:चे वडूज येथील आयडीबीआय बँकेत खाते उघडून त्यामध्ये 42 लाख 37 हजार 177 रुपये जमा करुन विशाल सुर्यवंशी याला 7 लाख 94 हजार रुपये वर्ग झाले आहेत. विनोद साळुंखे रा. खंडाळा याने आयडीबीआय बँक वाठार बुद्रुक शाखेत खात्यावर 2 लाख 80 हजार 637 रुपये जमा केले आहेत. या तिघांनी 45 लाख 17 हजार 814 रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करत आहेत.
घोटाळ्यात अनेकांच्या सहभागाची शक्यता
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्यातील रकमा अनेकांच्या नावे वर्ग झाल्या असल्याने पोलिसांच्या रडारवर ती नावेही येण्याची शक्यता असल्याने अनेकांना धडकी बसली आहे. विशेष म्हणजे गेली काही दिवस हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. प्रसारमाध्यमांना माहिती मिळू नये यासाठीही अनेकांनी प्रयत्न केल्याने या गुन्ह्यात शासकीय अधिकारी, कर्मचार्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी होत आहे. याप्रकरणात केवळ कंत्राटी कर्मचार्यांना बळीचा बकरा न करता या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस यंत्रणा जाणार का हे लवकरच दिसणार आहे.