जयपुर – राजस्थानात विधानसभेच्या करणपुर मतदार संघात झालेल्या पोटनिवडणूकीची मतमोजणी आज झाली; या मतदार संघात सत्तारूढ भाजपला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रूपेंद्रसिंह कुन्नुर यांनी भाजपचे मंत्री असलेले उमेदवार सुरेंद्रपालसिंह यांचा सुमारे साडेअकरा हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
राजस्थानात नुकत्याच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या आहेत. त्यात भाजपला बहुमत मिळाले आहे. पण त्यानंतर लगेचच झालेल्या पहिल्याच पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का पचवावा लागल्याने त्याचे मोठे राजकीय पडसाद अपेक्षित आहेत.
विशेष म्हणजे भाजपने या निवडणुकीत सुरेंद्रपाल सिंह यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला वजन प्राप्त व्हावे कारण पक्षाने त्यांना मंत्रीही केले होते. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे आचार संहिताभंगाचा आरोपही केला होता. परंतु तो आक्षेप फेटाळला गेला. मात्र जनतेच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेत्यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेससाठी हा निकाल एक गुडन्युज ठरली आहे. माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशोक गहलोत यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना विजयी कॉंग्रेस उमेदवारांचे अभिनंदन केले. भाजपच्या घमेंडीचा तेथील जनतेने पराभव केला आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली आहे. भाजपने आचारसंहिता भंग करून या उमेदवाराला मंत्रिपद दिले होते पण त्यांचा हा फंडा जनतेने स्वीकारला नाही असे ते म्हणाले.