राजपिपला (गुजरात) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तुरुंगात असलेले आपचे आमदार चैतर वसावा यांची भेट घेतली. भाजपने जुलूमशाही आणि हुकूमशाहीची परिसीमा गाठली असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. आमच्या आमदाराला केवळ राजकीय सूड बुद्धीने कारागृहात डांबण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
रविवारी केजरीवाल आणि मान यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील आदिवासीबहुल नेत्रंग भागात आमदार वसावा यांच्या समर्थनार्थ एका रॅलीला संबोधित केले. केजरीवालांनी यावेळी घोषित केले की, आमदार वसावा हे भरूच लोकसभा मतदार संघातील आमचे उमेदवार असतील.
वसावा सध्या नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा मतदार संघातील आमदार आहेत. भरुच लोकसभा मतदारसंघ सध्या भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांच्याकडे आहे.
आमदार चैतर वसावा यांना १४ डिसेंबर २०२३ रोजी वन अधिकार्यांना धमकावणे आणि नर्मदा जिल्ह्यातील स्थानिक आदिवासींच्या वनजमिनीवर शेती करण्यासंबंधीचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करत असताना हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी त्यांची पत्नी शकुंतलाबेन यांनाही अटक करण्यात आली होती. केजरीवाल आणि अन्य आप नेत्यांनी नर्मदा येथील राजपिपला जिल्हा कारागृहात आमदार वसावा यांची भेट घेतली.
नंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, आम्ही चैतर वसावा आणि शकुंतलाबेन यांना भेटलो. ते बरे आहेत, निरोगी आहेत, त्यांचे मनोबल उच्च आहे. ते लढतील आणि संघर्ष करतील. शेवटी, आम्हाला गुजरातमधून भाजपला उखडून टाकायचे आहे.कारण भाजपने जुलूमशाही आणि हुकूमशाहीची परिसीमा गाठली आहे.