नवी दिल्ली – भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायक्त अजय बिसारिया यांचे पुस्तक आले असून त्यात त्यांनी पाकिस्तानसंबंधिचा विशेष खुलासा केला आहे. पुलवामा घटनेनंतर भारताने जी आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे पाकिस्तान भयभीत झाले होते आणि त्यांना नरमाईची भूमिका घेत कशी माघार घ्यावी लागली होती आदी किस्से या पुस्तकात सांगण्यात आल्याचे एका संकेतस्थळावरील बातमीत नमूद करण्यात आले आहे.
यातील एक माहिती तर भारताने पाकिस्तानच्या दिशेने आपली ९ क्षेपणास्त्रे कशी तैनात केली होती आणि त्यामुळे पाकिस्तानातील इम्रान खान सरकार कसे घाबरले होते याची आठवण सांगणारी आहे. त्या रात्री इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा होती. तथापि, मोदी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते असेही पुस्तकात नमूद केले आहे.
माजी उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार ज्या रात्रीचा येथे उल्लेख करण्यात आला आहे त्या रात्रीला मोदी यांनी कत्ल की रात असे संबोधले होते. त्या रात्री म्हणजे २७ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे कुटनीतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. त्यांचा उल्लेख बिसारियांच्या पुस्तकात करताना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
बिसारिया म्हणतात त्या रात्री त्यांना इस्लामाबादेत भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांचा फोन आला. खानसाहेबांना (इम्रान खान) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी संभाषण केल्यानंतर बिसारिया यांनी दिल्लीतील लोकांशी संपर्क साधला. त्यावेळी मोदी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि काही महत्वाचा निरोप असेल तर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना कळवला जाईल असे बिसारिया यांनी मेहमूद यांना कळवले. त्या रात्री नंतर ते मेहमूद यांच्याशी बोलले नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची घोषणा केली. शांततेच्या दृष्टीने आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला अशी माहितीही इम्रान यांनी त्यावेळी पाकिस्तानच्या संसदेत दिली. या घटनेच्या अनुशंगाने बिसारिया लिहितात की शांततेच्या दृष्टीकोनात वर्धमान यांची सुटका केल्याचे पाकिस्तानने म्हटले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना याची कल्पना होती की भारतीय अधिकाऱ्याला इजा करणे आपल्याला किती महागात पडेल. अशा प्रकारचे अनेक किस्से बिसारिया यांनी या पुस्तकात नमूद केले आहेत.