मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. आज न्यायालयात सुनावणी झाली. चित्रपटगृहातील मारहाणप्रकरणी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली. दरम्यान, सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्यायालयासमोरील रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. त्यातून निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या वेळेत कामानिमित्ताने ठाणे स्थानक, कोर्टनाका, जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जितेंद्र आव्हाड पोलीस तपासासाठी सहकार्य करत नसल्याचा दावा केला. तसेच आव्हाडांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. सुनावणी घेताना न्यायाधीश बी. एस. पाल यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर न्यायालयाने आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपट बंड पाडल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ ते १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. शनिवारी सकाळी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांचे सहकाऱ्यांना हजर करण्यात आले.