मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असून तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची नोंद इतिहासात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत आणाच, निर्णयाचे स्वागत आहे.
परंतु,शिंदे फडणवीस सरकारच्या काळात इतर राज्यात गेलेले उद्योग कोण परत आणणार ?भावनेचे राजकारण करून राज्यातील तरुणांच्या भविष्यासोबत खेळ का?
सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजप महाराजांच्या तलवारीचा आधार का घेत आहे? pic.twitter.com/q9RGdlz1Fb
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 11, 2022
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवराज्याभिषेकाला 2024मध्ये 350 वर्षे पूर्ण होतील. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करत असून यावेळी जर जगदंबा तलवार भारतात परत आली तर आमचा आनंद द्विगुणित होईल.
यावर आता माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देतांना राज्य सरकारवर टोला लगावला आहे,’शिवाजी महाराजांची तलवार परत आणून राज्यातील जनतेची अस्मिता जपली जाणार आहेच. पण सोबतच राज्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देणारे उद्योग महाराष्ट्रात आणावे लागणार आहेत. पण त्याकडे लक्ष न देता तलवार परत आणण्यासारखे उद्योग करून सत्ताधारी बेरोजगारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सत्ताधारी करीत आहेत. राज्यातील तरुणांना आता हे कळून चुकले आहे. त्यामुळे महाराजांच्या जगदंबा तलवारीसोबत त्यांनी महाराष्ट्रात उद्योगही आणावे. तेव्हाच लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. ‘