अमरावती – पोलीस मारहाण प्रकरणात दोषी ठरलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. एवढंच नाही तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल अशी प्रतिक्रिया देऊन न्यायालयाने दोषी ठरवलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला असल्याचा टोला त्यांनी लगाविला.
कुलकर्णी म्हणाले, यशोमतीताईंना अमरावती जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांनी जे काही दुष्कृत्य केले तो म्हणजे निव्वळ आणि निव्वळ सत्तेचा माज होता. हा प्रसंग 25 मार्च 2012 रोजी राज्यात कॉंग्रेसचे शासन असताना घडलेला आहे. ड्युटीवर असलेल्या वर्दीधारी पोलिसाला मारहाण करण्याच्या प्रकरणी यशोमतीताईंना भाजपाने नव्हे न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
एक वेळ राजकीय आंदोलनात भावनेच्या भरात हातून गुन्हा घडतो, ते ही एकवेळ आपण समजू शकतो. पण कर्तव्याची चाड बाळगणाऱ्या व आग्रही पोलिसाच्या थोबाडीत हाणणे, कितपत योग्य आहे ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.