-हिमांशू
अच्छा! असं आहे होय! तरी म्हटलं, स्वर्गाच्या शिडीपासून उत्तर कोरियातल्या हुकूमशहाच्या खासगी आयुष्यापर्यंत असंख्य गोष्टी न मागता आपल्या ताटात का वाढल्या जातायत? तेही आग्रह करून! उत्तर कोरियात माणसांना उपाशी कुत्र्यांच्या पिंजऱ्यात टाकून मारतात आणि उपाशी माणसं कुत्री मारून खातात, हे “सामान्यज्ञान’ देण्याऐवजी “जीके’च्या पेपरात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सांगितली तर नाही का चालणार?
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढाच एखाद्या वृत्तवाहिनीचा आधार नाही का वाटणार? पण असं होत नाही. त्याऐवजी “चर्चा’ या नावाखाली मासळीबाजार पाहावा लागतो आणि कुणाचंच बोलणं नीट ऐकू येत नाही म्हणून अखेर टीव्ही बंद करावा लागतो.
गुन्हेगारीविषयक “अतिवास्तववादी’ (म्हणजे नाट्यमय) कार्यक्रम पाहून तर आपल्या आसपास गुन्हेगारीशिवाय काही घडतच नाही, असंच वाटून आपण हादरून जातो. आपल्या जवळपासच्या, आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या बातमीची वाट पाहात बसावं लागतं आणि शहरातल्या एखाद्या सीसीटीव्हीत काहीही दिसलं तरी त्याची “बातमी’ होते. अर्थात, तक्रारी करून तरी काय उपयोग म्हणा! आपणच या परिस्थितीला कारणीभूत आहोत, हे जाणवल्यानंतर नाराजी गिळावी लागते. लोकांना काय हवंय हे वाहिन्यांना वेळोवेळी समजत असतं आणि त्यानुसारच त्या “कन्टेन्ट प्लॅनिंग’ करतात. या प्रक्रियेला “टीआरपी’ म्हणतात आणि वृत्त किंवा मनोरंजन वाहिन्यांचं संपूर्ण विश्व (जाहिरातींसकट) त्यावरच उभं असतं.
लोकशाहीत सर्वकाही बहुमतावर चालतं, हे सूत्र स्वीकारल्यामुळे टीव्हीवर काहीही दिसलं तरी ते बहुमताचं आहे, हे लक्षात घेऊन शांत राहावं लागतं; परंतु या बहुमतातसुद्धा फेरफार केला जातो, असं जेव्हा मुंबई पोलीस म्हणाले तेव्हा सगळ्यांनीच कान टवकारले. “ज्या घरात कुणालाच इंग्रजी समजत नाही, अशा घरात इंग्रजी चॅनेल दिवसभर लावून ठेवलं जातं,’ असा दावा पोलिसांनी केला. काय खास असतं अशा घरात? या प्रश्नाच्या निमित्तानं टीआरपी कसा मोजतात याची उजळणी झाली. ठराविक घरांमध्ये टीव्हीला एक यंत्र जोडलेलं असतं. त्याला पीपल्स मीटर किंवा बॅरोमीटर असं म्हणतात.
घरात किती वेळ कोणतं चॅनेल बघितलं जातं, याची नोंद त्या यंत्रात होते. अशा प्रकारे, कोणत्या वेळेत कोणतं चॅनेल सर्वाधिक बघितलं जातं, याचा हिशेब केला जातो आणि त्यावरून कोणत्या चॅनेलचा कोणता कार्यक्रम अधिक लोकप्रिय आहे, हे तपासलं जातं. “हे यंत्र आपल्याच घरात का नाही बसवलं?’ असा प्रश्न अनेकांना पडेल; परंतु “मतदानानंतर एक्झिट पोल करणारी माणसं आपल्यालाच का भेटत नाहीत?’ हा प्रश्न जितका गूढ, तितकाच हाही! आपल्या मताप्रमाणेच आवडीनिवडीलाही कुणी विचारत नाही, असा याचा अर्थ!
परंतु या विचारांनी खट्टू होण्याची काहीच गरज नाही. टीआरपीच्या आकडेवारीत फेरफार केला जातो, हा मुंबई पोलिसांचा आरोप खरा ठरो वा खोटा; मुख्य मुद्दा असा की, मुळात “सॅम्पल साइज’च हास्यास्पद आहे. सव्वाशे कोटींच्या या देशात अवघ्या तीस हजार घरांमध्ये टीआरपी मोजणी यंत्रं बसवलेली आहेत. यंत्रांची भौगोलिक विभागणीही गमतीशीर आहे. म्हणजे दहा हजार यंत्रं एकट्या मुंबईतच आहेत म्हणे! तरी म्हटलं, वीज गेल्यावर फक्त मुंबईकरच कसे काय अस्वस्थ होतात?