-अमित डोंगरे
टी-20 क्रिकेट सुरू झाले त्यावेळी ते किती यशस्वी होईल अशी शंका घेतली गेली. मात्र, आता जवळपास दोन दशके होत आली व त्यातून मिळत असलेला पैसा पाहिला तर असे लक्षात येते की, काही देशांच्या खेळाडूंनी आपल्या देशाकडून खेळण्यापेक्षा आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळणेच पसंत केले आहे. त्यासाठी प्रसंगी काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली आहे.
आता ज्या प्रकाराच्या क्रिकेटला पहिल्यांदा बीसीसीआयने नकार दिला होता. त्याच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा आयोजित करत जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत लीग अशी ओळखही मिळवून दिली. याचे फायदे-तोटे सर्वांसमोर आहेतच. त्यातही अशा क्रिकेटमधून कसोटी संघासाठी खेळाडू मिळणे अत्यंत कठीण बनले आहे. जे नवोदित फलंदाज कसोटी क्रिकेटच्या मुशीतून तयार होत होते त्यांची संख्या रोडावली आहे. सध्याच्या काळात इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोनच देशांत खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेट जिवंत राहिले असेच म्हणावे लागत आहे. भारतीय संघ सध्या आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानी असला तरीही भारताला गेल्या पाच वर्षांचा हिशेब पाहिला तर परिपूर्ण कसोटी फलंदाज मिळालेला नाही. त्यादृष्टीने आयपीएल अपयशीच ठरल्याचे सांगावे लागत आहे.
पण याच टी-20 क्रिकेटमधून भारतीय संघाला रवींद्र जडेजा, शुभमन गील, इशान पोरेल, विजय शंकर, संजू सॅमसन, नवदीप सैनी, दीपक चहर, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांच्यासारखे खेळाडू गवसले. मात्र, गेल्या पाच वर्षांत पॉथ्वी शॉ वगळता एकही खेळाडू असा नाही की जो कसोटी संघातही स्थान मिळवेल.
2015 सालापासून जगभरातील टी-20 लीगच्या संख्येत वाढ झाली. सध्याच्या काळात ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग, वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन लीग, पाकिस्तानाच सुपर लीग अशा स्पर्धा होत आहेत. त्यात खेळणारे खेळाडू पाहिले तर असे सहज लक्षात येते की त्यांना या स्पर्धेतून मिळणारा प्रचंड आर्थिक लाभ पाहता ते त्यांच्या देशाकडून खेळण्यापेक्षा अशा लीगलाच जास्त प्राधान्य देत आहेत.
यंदा अमिरातीत होत असलेल्या आयपीएलचे 13 वे वर्ष आहे. करोनाचा धोका फारसा नसल्याने ही स्पर्धा अमिरातीत होत आहे. ही स्पर्धा पार पडल्यावर श्रीलंका, पाकिस्तान लीग होणार आहेत. जे भारतीय खेळाडू देशाकडून टी-20 सामने खेळतात त्यांना एका सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. मात्र, त्याच खेळाडूंनी आयपीएल खेळली तर वरिष्ठ खेळाडूंना काही कोटी रुपयांची प्राप्ती होते. त्यामुळे ज्या खेळाडूंना असे वाटते की त्यांची भारतीय संघात निवड होणार नाही किंवा परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशाच्या संघातून खेळण्याची संधी मिळणार नाही ते वेळेपूर्वीच निवृत्ती घेतात व जगात विविध देशांत होत असलेल्या लीगमध्ये खेळून गबर होतात. आयपीएलनंतर होत असलेल्या काही लीगमधी सामने धरून सुमारे दीडशे दिवसांत तेवढेच सामने होणार आहेत.
2007 साली झालेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा भारतीय संघाने जिंकल्यावर आपल्याकडेही या वेगवान सामन्यांचे वारे वाहू लागले. मात्र, त्यातून आर्थिक लाभ होत असल्याने खेळाडू व्यावसायिक विचार करू लागले असून आपल्याला देशाकडून खेळता यावे या स्वरूपाची जागा आपल्याला आयपीएल खेळता यावे या स्वप्नाने घेतली आहे.
जुने जाणते क्रिकेटपटू म्हणतात की, आमची क्रिकेटवर श्रद्धा आहे. तर, नवोदित खेळाडू म्हणतात की, श्रद्धा आमची पण आहे मात्र, केवळ श्रद्धेने पोट भरत नाही. म्हणूनच जागतिक क्रिकेटचा प्रवास आता बिशनसिंग बेदी ते मंदीरा बेदी असा झाला आहे आणि आता हा बदल सगळ्यांनी स्वीकारलाही आहे. कालाय तस्मै नमः दुसरे काय.