‘राज्य सरकारने आदेश दिले नाहीत’ म्हणत मंगळवारचीही सभा गुंडाळली
पुणे – ‘राज्यसरकारने आदेश दिले नाहीत,’ असे सांगून पुन्हा एकदा मंगळवारची मुख्यसभा सत्ताधाऱ्यांनी तहकूब केली. वास्तविक राज्य सरकारच्या आदेशाची अर्धीच बाजू सत्ताधाऱ्यांकडून दाखवली जात आहे. ही वस्तुस्थिती विरोधकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे काहीएक ऐकून न घेता मंगळवारच्या सर्व सभा महापौरांनी तहकूब केल्या.
राज्य सरकारने सभा घेण्याला मज्जाव केला आहे. त्यामुळे सभागृहात चर्चा होऊ शकत नाही, असे सांगून एप्रिलपासूनच्या सर्व मुख्यसभा सत्ताधाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशाचे कारण सांगून तहकूब केल्या आहेत. “पाचपेक्षा जास्त जणांना एका ठिकाणी जमता येणार नाही,’ असे सांगून सुरूवातीला नगरसेवकांना सभागृहात येण्यापासून मज्जाव केला आणि ऑनलाइन सभा चालवली. मात्र, यात सभासदांना बोलण्याची संधीच दिली नाही.
‘प्रत्येक सभेवेळी हेच कारण देण्यात आले. मंगळवारच्या सभेत ऑनलाइन असलेल्या सदस्यांना बोलू द्या,’ अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली. त्यावेळी एका सदस्याला बोलण्याची संधी दिली, परंतु त्यांचा कॉल मध्येच “कट’ झाल्याने सभा तहकुबी पुकारली.
“फडणवीस सरकारचे तुम्ही जेवढे ऐकत नव्हतात, तेवढे ठाकरे सरकारचे कसे काय ऐकत आहात?’ असा उपरोधिक टोला सुभाष जगताप यांनी हाणला. परंतु “तुम्हीच मुख्यसभा चालवण्याचे आदेश घेऊन या’ असे सांगत सभागृहनेते धीरज घाटे यांनी सभा तहकुबी मांडली.
विरोधकांना बोलण्याची संधीच नाही…
सत्ताधाऱ्यांना उत्तरे द्यायची नाहीत म्हणून सभा गुंडाळत असल्याचा आरोप विरोधी पक्ष सदस्यांनी केला. ओढा, अतिक्रमणे, ड्रेनेज लाइन या विषयावर बोलायचे आहे अशी मागणी सदस्यांनी केली, मात्र ती अमान्य करत सगळ्या सभा महापौरांनी तहकूब केल्या.