ओगलेवाडी -ओगलेवाडीसह परिसरात गेल्या आडवड्यापासून दोन ते तीनवेळा झालेल्या अतिवृष्टीने येथील विहिरीचे व अनेक लहानमोठे तलाव, बंधाऱ्याचे पाणी आता तुडूंब भरले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच येणाऱ्या रब्बी हंगामासाठी या पाण्याचा उपयोग करून अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येणार आहेत.
यंदा, शेतीसाठीपूरक पाऊस पडला आहे. खरिप पिकांसाठी सुरूवातीला चांगला पाऊस झाला होता. त्या पिकांची आता सध्या काढणी सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने काही पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, दुसरीकडे विहीरी व लहान-मोठे तलाव, बंधारे पूर्णरित्या भरले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. तलाव आणि विहीरी भरल्याने रब्बी पिकांसाठी ही चांगली बातमी आहे.
जमिनीतील पाणीपातळी एवढी वाढली आहे की, सध्या विहिरीचे पाणी प्रचंड प्रमाणात वर आले आहे. काठाला उभे राहिले तरी सहज हाताला पाणी येत आहे. अनेक विहिरी तोंडाबरोबर भरल्या आहेत. ओगलेवाडी परिसरातील सर्व नाले, ओढे सध्या तुंडूब भरून वाहत आहेत.
परिसरात हजारो हेक्टर सुपिक शेती आहे. येथील शेतकरी अनेक पिके घेत असतात. मात्र, महत्त्वाचे पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. साहजिकच ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर येथे घेतले जाते. ऊस पिकासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.
मात्र, या पाण्याची चिंता आता परिसरातील विहिरी भरल्याने काहीअंशी कमी झाली आहे. अनेक लहान-मोठे तलावांसह बंधारेही भरले आहेत. त्यामुळे पुढील सहा ते आठ महिने तर पाणी कमी पडणार नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. जमिनीत पाण्याची पातळी वाढल्याने पाणी टिकून राहणार आहे. परिणामी परिसरात ऊसाच्या क्षेत्रात अजून मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.