मुंबई – राज्याचे उच्च व उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका व्हर्च्यूएल रॅलीमध्ये शिवसेनेसोबत युती केल्यावरून खंत व्यक्त केली होती.
फडणवीसांच्या याच वक्तव्यावर आज सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत यांनी, ‘फडणवीसांना पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही याची खंत आहे.’ असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला.
काय म्हणाले होते फडणवीस?
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या एका व्हर्च्यूएल रॅलीमध्ये फडणवीस यांनी भाजपसोबतच्या युतीमुळेच शिवसेनेच्या जागा वाढल्या असा दावा करत, ‘युती केली ही चूक झाली. युती नसती तर भाजपाच्या १५० प्लस जागा आल्या असत्या.’ असं म्हंटल होत.
पहाटेची शपथ
विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचे राजकारणामध्ये अनेक उलटफेर घडून आले. शिवसेनेने भाजपसोबतची निवडणुकांपूर्वीची युती तोडत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीमध्ये जाण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. देवेंद्र फडणवीस व अजित पायावर यांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने एकाच खळबळ उडाली होती.
मात्र अजित पवारांचे हे बंड सपशेल अपयशी ठरल्याने फडणवीस-पवार सरकारला अल्पावधीतच सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते.