ग्वाल्हेर – मध्यप्रदेशात भाजपचे पंधरा वर्षाचे राज्य होते. या पंधरा वर्षात भाजपने काय केले याचा हिशोब त्यांनी द्यायला हवा अशी मागणी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केली आहे. आपले सरकार या राज्यात केवळ पंधरा महिन्यांसाठी होते या पंधरा महिन्यांच्या कालावधीचा हिशोब मागण्याऐवजी भाजपने त्यांच्या पंधरा वर्षाच्या राजवटीचा हिशोब आधी दिला पाहिजे असे ते म्हणाले.
भाजपने पैशाचा वापर करून मध्यप्रदेशतील सत्ता बळकावली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या भाजप मध्ये गेलेले कॉंग्रेसचे बंडखोर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रात कमलनाथ यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली आहे.
तत्पुर्वी ते येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की आम्हाला शिवराजसिंह चौहान किंवा भाजपकडून सर्टिफिकेटची गरज नाही आम्ही पंधरा महिन्यात येथे काय केले आहे याची जनतेला कल्पना आहे. आमच्याकडून पंधरा महिन्याच्या राजवटीचा हिशोब मागण्याचे भाजपचे धाडसच कसे झाले असा सवाल त्यांनी केला.
आम्ही राज्यात मतांच्या आधारे सरकार स्थापन केले पण भाजपने पैशाच्या आधारे ही सत्ता बळकावली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.