नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाजवळ करोनाची लागण झालेल्या तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती नसल्याचे वृत्त समोर आले होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लबोल केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, प्रतिकूल डाटा-मुक्त मोदी सरकार. थाळी वाजवणे, दिवे लावणे यापेक्षा अधिक गरजेचे त्यांची सुरक्षा आणि सन्मान आहे. मोदी सरकार, करोना योद्ध्यांचा इतका अपमान का?, असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे विचारत संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, आरोग्य सेवा कर्मचारी जसे डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस, आशा वर्कर्स यांच्यापैकी किती जणांना करोनाची बाधा झाली आणि किती जणांचा मृत्यू झाला, असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या १५५ आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये ६४ डॉक्टर्स, ३२ नर्सिंग स्टाफ, १४ आशा वर्कर्स आणि ४५ अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.