मुंबई – शिवसैनिकांकडून कथित मारहाण झालेले नौदलाचे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. जर राज्य चालवता येत नसेल, तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.
“मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करतो, की जर राज्य चालवता येत नसेल. तर त्यांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखू शकेल असे सरकार जनतेला निवडून देऊ द्यावे.’ असे पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले.
आज सकाळी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी शर्मा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि न्याय मिळवण्यासाठी आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.
मदन शर्मा यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. मात्र या सर्वांची काल जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या सर्वांना जामीन मिळण्यावर राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे.