नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या का वक्तव्याचा संदर्भ देत सरकारला टोला लगावला आहे. चीन आपली जमीन घेत आहे आणि पुन्हा ती ताब्यात घेण्यासाठी आपल्या सरकारकडे मात्र काहीच योजना नाहीय असा टोला राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.
The Chinese have taken our land.
When exactly is GOI planning to get it back?
Or is that also going to be left to an 'Act of God'?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 11, 2020
“चीनने आपल्या भूभागावर मिळवलेला ताबा सुद्धा अॅक्ट ऑफ गॉड आहे का? चीनने आपली जमीन घेतली आहे. सरकारकडे ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची काही योजना आहे का? की याला पण आता अॅक्ट ऑफ गॉडच म्हणायचं?,” असे ट्विट राहुल यांनी केले आहे.
२७ ऑगस्ट रोजी झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये निर्मला सितारामन यांनी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना अॅक्ट ऑफ गॉडचा उल्लेख केला होता. करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (अॅक्ट ऑफ गॉड) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर आणि केंद्राच्या आर्थिक धोरणांवर टीका केल्याचे पहायाला मिळाले होते.