मंचर – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावरून विजेच्या तारा जात असल्याने हे काम रखडले आहे. महावितरण कंपनीने तातडीने येथील खांब इतरत्र स्थलांतरीत करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मंचर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा पाया आणि कॉलमचे काम झाले आहे; परंतु येथे सुरू असलेल्या बांधकामावरून महावितरणच्या तारा गेल्याने कॉलमच्या वर स्लॅब टाकता येत नसल्याने काम रखडले आहे. शाळा व्यवस्थापन समितीने महावितरणला तारा दुसरीकडून न्याव्यात, याबाबत विनंती अर्ज केला आहे; परंतु महावितरणकडून कामात चालढकल होत आहे. परिणामी शाळेचे बांधकाम रखडले आहे.
सध्या ऑनलाइन पद्धतीने कामांची पाहणी केली जाते आहेण ऑनलाइन पद्धतीने हे काम अपूर्ण असल्याने ठेकेदाराला शासकीय दंड बसत आहे, तसेच महावितरण शाळा व्यवस्थापन समितीला “तुमच्या खर्चाने खांब काढा’, असे सांगितल्याचे कळते आहे. महावितरणने खांब व तारा काढून विजेच्या तारा दुसरीकडून न्याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
वर्गखोल्यांच्या रखडलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण बाणखेले, मनसेचे वैभव बाणखेले, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ थोरात आणि सुरेश घुले उपस्थित होते. महावितरणने तातडीने खांब इतरत्र हलवावा अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता पोल स्थलांतर करण्याचे काम एजन्सीकडे देऊन कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.