साखरेच्या दराच्या प्रमाणात उसाचे दर ठरविण्याची शिफारस
साखर कारखाने नफादायक करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न
नवी दिल्ली – साखर उद्योगाची निकोप वाढ होण्यासाठी उसाचे दर साखरेच्या दराशी संलग्न करण्याची गरज असल्याची शिफारस निती आयोगाच्या कृती समितीने केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे साखरेच्या दराच्या प्रमाणात उसाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
साखर उद्योगावर अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी रमेशचंद्र यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने म्हटले आहे की, उसाच्या लागवडीखालील काही भाग इतर पिकांसाठी उपलब्ध करण्याची गरज आहे.
सध्या देशात गरजेपेक्षा साखरेचे उत्पादन जास्त होत असल्यामुळे साखर कारखानदारीवर परिणाम झाला आहे. यासाठी उसाच्या लागवडीखालील 3 लाख हेक्टर जमीन इतर पिकांसाठी वापरण्याकरिता प्रयत्न केले जाऊ शकतात. त्याकरिता या शेतकऱ्यांना काही आर्थिक अनुदान दिले जाऊ शकते. त्यामुळे एक तर साखरेचे उत्पादन अतिरिक्त होणार नाही. त्याचबरोबर पर्यावरण संतुलनासाठी याचा उपयोग होणार आहे.
कारण उसाला जास्त पाणी लागते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. साखरेचे दर कोसळल्यानंतर उसाचे दर कोसळतील. त्याचा परिणाम शेतकऱ्यावर होऊ नये याकरिता किंमत स्थिरता फंड निर्माण करण्याची गरज असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. उसाचे किमान आधारभूत दर जाहीर केल्यानंतर सहा महिन्यांनी या दरांचा आढावा घेतला जावा, असे सुचविण्यात आले आहे.
साखरेच्या दरात वाढ करण्याची गरज
कृती दलाने साखरेच्या किमान विक्री दरात 31 रुपयावरून काही प्रमाणात वाढ करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना पुरेसा निधी उपलब्ध होईल. त्यातून ते शेतकऱ्यांचे देणे देऊ शकतील.