नवी दिल्ली – नेतृत्वाच्या पेचाने ग्रासलेल्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी सात तासांपेक्षा अधिक काळ चालली. त्या बैठकीत आणि बाहेरही घमासान झाल्याचे चित्र समोर आले. अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपदाची सुत्रे कायम ठेवत पक्षाने पेचावर तात्पुरता तोडगा काढला. मात्र, त्या पत्रामुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे.
सोनिया गांधी यांना ज्या २३ कॉंग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्यात कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कपिल सिब्बल म्हणाले कि, हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
It’s not about a post
It’s about my country which matters most— Kapil Sibal (@KapilSibal) August 25, 2020
दरम्यान, पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिणारे नेते भाजपला मिळालेले आहेत, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याच्या बातम्या सोमवारी सकाळपासूनच टीव्ही मीडियावर जोरात रंगल्या होत्या. पण राहुल गांधी यांनी तशा अर्थाचा एक शब्दही उच्चारला नाही, असा खुलासा कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. तथापि, त्या वृत्तावर नाराज होऊन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेणारा एक ट्विटर संदेश जारी केला होता. पण त्यावर खुद्द राहुल गांधी यांनीच कपिल सिब्बल यांना व्यक्तिगत संपर्क साधून या वक्तव्याचा इन्कार केल्याने कपिल सिब्बल यांनी आपले ट्विट मागे घेतले आहे. त्यामुळे या नाराजी नाट्यावर काही तासांतच पडदा पडला. परंतु, कपिल सिब्बल यांच्या आजच्या ट्विटमुळे यांच्या अनेक शंका व्यक्त करण्यात येत आहेत.