शालेय शिक्षण विभागाकडून आदेश
पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रशासकीय बदल्यानंतर आता 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर विनंती बदल्यांच्या सत्राला सुरुवात केली आहे. यात एका दिवसात 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांचे आदेशही करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 हे दि. 1 जुलै 2006 पासून अंमलात आले आहेत. बदली करण्याबाबत सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ व गट-ब मधील संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याचा निर्णय 30 मे 2015च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेला आहे.
राज्यात करोनाचे संकट असल्याने अधिकाऱ्यांनी आपापल्या सोयीच्या ठिकाणी विनंती बदल्या मागितल्या आहेत. विनंती बदल्यांच्या रांगेत असलेल्या अधिकाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे टप्प्या- टप्प्याने आता या बदल्यांचे आदेश निघणार आहेत. जिल्हा व प्रशिक्षण संस्थांमधील 6 अधिव्याख्याता, 3 गट शिक्षणाधिकारी, 2 उपशिक्षणाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांची अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयात समाज शिक्षणाधिकारी पदावर बदली करण्यात आले आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशिल खोडवेकर यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. शिक्षण आयुक्तांनी बदली झालेले अधिकारी दिलेल्या मुदतीत पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील याची खातरजमा करावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.